अजितदादांनी बॅटिंग केली, रन काढले, मला वाटतं…देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी
अलीकडच्या काळात खोटे बोल पण रेटून बोल सुरु आहे. एका निवडणूक पुरते खोटे बोलू शकतात. खोट्याचे आयुष्य छोटे असते. तर खऱ्याचे आयुष्य दीर्घायुष्य असते. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहतील. गोपले साहेबांनी एक मोठा लढा निर्माण केला होता. समितीचा अहवाल लवकर दिला तर त्यावर आधारित एक आयोग तयार करावा लागेल. आयोगानुसार वर्गवारी करायची आहे. महायुतीचे सरकार वेगाने निर्णय घेणारे आहे. तुम्ही जेवढ्या वेगाने अहवाल द्याल, तेवढ्या वेगाने निर्णय घेतला जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील मुले देखील उच्च शिक्षण घेऊन सनदी अधिकारी व्हावीत यासाठी राज्य सरकारने ‘बार्टी’च्या ‘आर्टी’ नावाने संस्थेची स्थापना केली आहे. या सोहळ्यात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहीले. अजित दादांनी इतकी बॅटिंग केली आणि रन काढलेत मला वाटत आता मला जास्त रन काढण्याची आवश्यकता नाही असे सांगत फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की दादा थेट बोलतात आणि सत्य बोलतात. आपण आज ‘आर्टी’ची सुरुवात करत आहोत. राज्यातील मातंग समाजाच्या चळवळीसाठी ही मोठी गोष्ट आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांचा रशियात पुतळा उभारण्यात आला त्यावेळी त्याच्या उद्घाटनाला आपण गेलो होतो. रशियातील लोकांना तिथल्या साहित्यिकांना त्यांच्याबद्दल असलेला आदर बघुन माझा ऊर भरून आला होता. रशियात आजही अण्णा भाऊ साठे यांच्याबाबत आदर व्यक्त केला जातो. रशियात जाऊन त्यांनी मराठीत भाषण केले होते असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणायचे की मला लढा मान्य आहे, रडणं मान्य नाही, आज या समाजातील नेते देखील लढत आहेत. अडीच वर्ष आपण सत्तेबाहेर होतो त्यामुळे आपण घेतलेले निर्णय कुठे कुठे अडकले होते हे तुम्हाला माहिती असेलच असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
आज महत्त्वाचा क्षण आला
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले व्यक्तिमत्त्व त्यांनी वैश्विक करून दाखवले. केवळ रशिया नव्हे तर जगातील कित्येक देशांत त्यांचे साहित्य पोहोचले आहे. मला लढा मान्य आहे, रडगाणे मान्य नाही, हे सांगणारे अण्णाभाऊ साठे आहेत, तुम्ही देखील रडला नाहीत, लढत राहिला हे पाहताना आनंद वाटतो. अनेक वर्षे लहुजी साळवे आयोगाचा अहवाल पडून होता. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा हा आयोग बाहेर काढला. बैठक घेतली आणि निर्णय घेतले. मधे अडीच वर्षे आपण बाहेर होतो, तेव्हा घेतलेले निर्णय अडकले होते. आता त्या निर्णयांची अंमलबजावणी सुरु आहे. लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची जागा काही बिल्डरांनी घशात घातली होती. आपण त्या जागेवर आरक्षण घातले आणि स्मारकाच्या निर्मितीचे भूमिपूजन केले आहे. आता त्या ठिकाणी हॉस्टेल तयार करीत आहोत. ते आर्टीच्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेऊ असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मातंग समाजाचे 10 आयएएस आणि आयपीएस अधिकारी मला…
जाज्वल्य विचार या समाजातील तरुणांचे आहे. पण दुर्दैवाने योग्यवेळी संधी मिळाली नाही, म्हणून तुलनेने हा समाज मागे राहिला आहे. आर्टीच्या माध्यमातून आमच्या मातंग समाजाचे 10 आयएएस आणि आयपीएस अधिकारी मला दिसत आहेत. वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून त्यांचा विकास करण्यासाठी ही आर्टी स्थापन केली आहे. रोजगार निर्मिती, स्टार्ट अप्स, उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. याचा जेवढा विस्तार वाढेल, तो विस्तार वाढवण्यासाठी जेवढा निधी लागेल, एक पैसा कमी पडू देणार नाही, हा शब्द देतो. मानव संसाधनाची निर्मिती सर्वात महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे मानव संसाधन असते तो समाज कधीही मागे राहत नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.