वाघ्या कुत्र्याचे इतिहासात पुरावे, शिल्प हटवू देणार नाही; लक्ष्मण हाके यांचा इशारा
रायगड किल्ल्यावरील ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या वाघ्या-कुत्र्याच्या शिल्पाचे विरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी मागणी केली आहे. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी याला विरोध दर्शवला आहे आणि कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरुन हटवण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. याबद्दलचे पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. आता या मागणीला धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे.
लक्ष्मण हाके यांनी नुकतंच पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी कोर्टात जाऊ पण रायगडवरील वाघ्या कुत्र्याच शिल्प हटवून देणार नाही, असा इशारा दिला आहे. संभाजी ब्रिगेड, संभाजी भोसले यांनी महाराष्ट्रात जो काही उपद्वयाप चालू केला आहे, त्याला धनगर समाजाचा पूर्णपणे विरोध आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
संभाजी भोसलेंनी ३१ तारखेचा अल्टिमेटम का दिला?
संभाजी भोसलेंना विकास आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष बनवलं आहे. त्यांनी रायगड किल्ल्याचे सरंक्षण करण्याऐवजी नासधूस करण्याची भूमिका गेल्या अनेक दिवसांपासून घेतलेली आहे. संभाजी महाराजांनी ३१ मे ही तारीख का निवडली. ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची त्रिशतकोत्तर म्हणजे ३०० वी जयंती महाराष्ट्र साजरा करत आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या गावी पंतप्रधान मोदींना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो खूप मोठा कार्यक्रम आहे. त्याआधी संभाजी भोसलेंनी ३१ तारखेचा अल्टिमेटम का दिला? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला.
धनगर समाजाचा पूर्णपणे विरोध
विशालगडाप्रमाणेच वाघ्याच्या समाधीकडे लक्ष वेधून महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करण्याचा प्लॅन संभाजीराजे भोसलेंचा आहे. २०१२ ला संभाजी ब्रिगेडने हा वाघ्याचा पुतळा जरी फेकलेला होता, तरी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तो पुतळा आहे त्या ठिकाणी बसवलेला होता. परत एकदा संभाजी ब्रिगेड, संभाजी भोसले यांनी महाराष्ट्रात जो काही उपद्वयाप चालू केला आहे, त्याला धनगर समाजाचा पूर्णपणे विरोध आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
रायगडवरील वाघ्या कुत्र्याच शिल्प हटवून देणार नाही
“रायगड विकास प्राधिकरणावरुन संभाजीराजे भोसले यांची हकालपट्टी व्हावी. कारण त्यांनी विशालगडाची नासधूस केली आहे. आता वाघ्या कुत्र्याचे नासधूस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर ३१ मेच्या आधी जर असं काही घडलं तर तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजाला त्याला विरोध असेल. आम्ही मुख्यमंत्र्याला पत्र लिहू, कोर्टात जाऊ पण रायगडवरील वाघ्या कुत्र्याच शिल्प हटवून देणार नाही. पुरातत्व खात्यालाच याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे”, असेही लक्ष्मण हाकेंनी म्हटले.