आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा – दिशा सालियान केसवरून नितेश राणे आक्रमक
दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. या प्रकरणी केस दाखल करून आदित्य ठाकरेंना अटक करावी, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी नितेश राणेंनी घेतली आहे.

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला. यामुळे हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं असून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही या याचिकेत आरोप करण्यात आले होते. पेडणेकरांनी दिशाभूल केल्याचाही आरोपही याचिकेत आहे. आता याच मुद्यावरून भाजचे नेते, मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ही फार सरळ, सोपी केस आहे. ती जर (दिशाची) आत्महत्येची केस होती तर 8 जूनपासून ते आत्तापर्यंत पळापळी का चालली आहे, लपवालपवी का चालली आहे ? आदित्या ठाकरेंना यातून वाचवावं का लागतंय ? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. त्यांची जर काहीच इन्व्हॉल्व्हमेंट नसेल तर त्यांची मग एवढी पळापळ का सुरू आहे ? असे ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं होतं की, त्यानुसार, कोणावरही बलात्काराचा चार्ज असेल तर सर्वात पहिले त्याच्याविरोधात केस रजिस्टर करावी लागते. त्या नियमानुसार, केस दाखल करून आदित्य ठाकरेंना अटक करावी, त्यांची चौकशी करावी, ज्याचं ज्याचं नाव याप्रकरणात असेल,जो न्याय अन्य लोकांना लागतो, तोच न्याय आदित्य ठाकरेंना लावावा अशी आक्रमक भूमिका घेत नितेश राणेंनी अटकेची मागणी केली आहे.
आमची थोबाडं बंद होतील
आदित्य ठाकरे असतील, सूरज पंचोली असेल किंवा दिनो मोरिया असेल त्यांची चौकशी करावी, त्यांचा या केसमध्ये काहीच हात नसेल तर चौकशीमध्ये दूध का दूध पानी का पानी का पानी होईल, आम्हा सर्वांची थोबाडं बंद होऊन जातील, असे राणे म्हणाले. ही आत्महत्याच होती, या केसमध्ये काहीच नाहीये माझा हात, मला गोवण्यात येत आहे, असा विश्वास जर आदित्य ठाकरेंना असेल तर फार सरळ सोप आहे. त्यांनी चौकशीला सामोरं जावं, खरं काय ते सांगावं, पुरावे द्यावेत आणि आम्हाला सर्वांना खोटं ठरवावं असं आव्हानही नितेश राणेंनी दिलं.
हे प्रकरण आत्ताच का तापलं, ते तापवलं गेलं आहे का ? असा सवाल विचारत मुलीची हत्या झाली असेल तर कोणतेही आई-वडील 5 वर्ष गप्प बसणार नाहीत असा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला होता. त्यावरही नितेश राणेंनी थेट उत्तर दिलं. त्या 5 वर्षांमध्ये यांच्याच, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या ( उद्धव ठाकरे) मुलाचं (आदित्य ठाकरे) नाव केसमध्ये आलं होतं. त्यांनी किती मोठं प्रेशर टाकलं होतं, हे तुम्ही दिशा सालियानच्या वडिलांकडून ऐकावं. काहीही न बोलण्यासाठी, आमच्यावर फार मोठा दबाव होता, असं त्यांनी स्वत: सांगितलं होतं, असा दावा राणे यांनी केला. किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी का गेल्या होत्या मग ? असा सवालही त्यांनी केला.
याप्रकरणात आता सर्व राजकारण्यांनी बाजूला व्हायला पाहिजे, एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, तिची हत्या झाली. आता तिला न्याय मिळाला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे, एवढीच भूमिका असल्याचं राणेंनी नमूद केलं.
राऊतांचं वय वाढलं पण बुद्धी नाही, राणेंचा खोचक टोला
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सरकारव र उलटला आहे, त्यावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी दिशा सालियनचा मुद्दा पुन्हा समोर आणला आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला होता. त्यावर नितेश राणेंनी खोचक टोला हाणला. माणसाचं वय वाढतं, पण कदाचित बुद्धी वाढत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. औरंगजेबाचा विषय , नागपूरला झलेला हिंसाचार आणि दिशा सालियान यांच्या वडिलांची भूमिका याच्याकत काय संबंध असू शकतो ? असा सवाल राणेंनी विचारला.
दिशा सालियानच्या वडिलांचं राजकारणाशी काही घेणंदेणं नाही, त्यांनी एक भूमिका मांडली, ते कोर्टात गेले. अनेक लोकं या केसचा फॉलोअप घेत आहेत. कोर्टात तारखा पडत आहेत. आणि आता दिशा सालियानच्या वडिलांचा विश्वास बसला आहे की माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, त्याच्यात काहीतरी गडब आहे, तिची हत्या झाली असं त्यांना वाटतंय. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका असल्याचं राणे म्हणाले.