घरात पुराचं पाणी शिरल्यास मिळणाऱ्या मदतीत दुप्पट वाढ
घरांमध्ये पाणी शिरुन मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. घरात पाणी (Western Maharashtra Flood) घुसल्यानंतर राज्य सरकारकडून जी मदत दिली जाते, त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याच्या निर्णयाला कॅबिनेटने मंजुरी दिली.

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराने (Western Maharashtra Flood) थैमान घातलंय. घरांमध्ये पाणी शिरुन मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. घरात पाणी (Western Maharashtra Flood) घुसल्यानंतर राज्य सरकारकडून जी मदत दिली जाते, त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याच्या निर्णयाला कॅबिनेटने मंजुरी दिली.
नैसर्गिक आपत्तीमध्ये 2 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात बुडाले असल्यास, घर पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा घरांचे पूर्णत: नुकसान झाले असल्यास कपडे, भांडी, घरगुती वस्तुंसाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते. अशा प्रकारच्या नुकसानीसाठी सरकारकडून प्रति कुटुंब 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येतं.
या अर्थसहाय्याच्या रक्कमेत 2019 या वर्षासाठी सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागासाठी 10 हजार रुपये प्रति कुटुंब आणि शहरी भागासाठी 15 हजार रुपये प्रति कुटुंब मदत म्हणून देण्यात येणार आहे. यावर्षी 26 जुलै 2019 नंतर ज्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन घरामध्ये पाणी शिरले आणि ज्यांचे नुकसान झाले आहे, केवळ त्यांनाच ही मदत दिली जाणार आहे. ही मदत या घटनांपुरतीच मर्यादित राहणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातलंय. कृष्णा आणि पंचगंगा नदीचं पाणी शहरात घुसलंय. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. एनडीआरएफकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम करण्यात येतंय. पण घरामध्ये पाणी शिरल्यामुळे धान्य, कपडे आणि महागड्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.