अमळनेरमध्ये विहीरी बुडाल्या, कल्याणमध्ये घराचं छत कोसळलं, पाऊस बनला कर्दनकाळ

| Updated on: Jun 28, 2024 | 7:47 PM

अमळनेरमध्ये अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. शेतात पाण्याचे तलाव निर्माण झाले आहेत. काही भागांमध्ये कित्येक एकर शेती वाहून गेली आहे. तर काही ठिकाणी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच शेतातील विहिरी सुद्धा जमीन पातळीवर भरल्या. तसेच कल्याणमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे.

अमळनेरमध्ये विहीरी बुडाल्या, कल्याणमध्ये घराचं छत कोसळलं, पाऊस बनला कर्दनकाळ
अमळनेरमध्ये विहीरी बुडाल्या, कल्याणमध्ये घराचं छत कोसळलं
Follow us on

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडतोय तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पण ज्या ठिकाणी पाऊस पडतोय त्या ठिकाणी पिकांची खूप नासाडी करत असल्याचं बघायला मिळत आहे. जळगावच्या अमळनेर तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातलं आहे. पावसाने अमळनेरच्या जवखेडा, आंचलवाडी शिवारात खूप नुकसान केलं आहे. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. शेतात पाण्याचे तलाव निर्माण झाले आहेत. काही भागांमध्ये कित्येक एकर शेती वाहून गेली आहे. तर काही ठिकाणी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच शेतातील विहिरी सुद्धा जमीन पातळीवर भरल्या होत्या. या विहिरी इतक्या भरगच्छ पाण्याने भरल्या आहेत की, विहिरीच पाण्यात बुडल्यासारखं भासत आहे. त्यामुळे पाऊस हा अक्षरश: कर्दनकाळ बनून आला की काय? असा विचार आता शेतकऱ्यांच्या मनात येतोय.

अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेली जवखेडा , आंचलवाडी या गावात अतिवृष्टी झाली. जवखेडा येथे ग्रामपंचायतजवळ गावदरवाज्याच्या बाहेर नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे आता गावात प्रवेश करणे देखील अवघड झाले आहे. पेरणी होऊन पिके उगवली होती. मात्र अतिवृष्टीने पिके वाहून गेली. फक्त पिकेच काय, काही शेतातली माती देखील वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. २८ जून पर्यंत तालुक्यात १८९.५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कल्याणमध्ये घराचं छत कोसळलं

पावसाचं हे रौद्र रुप ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातही बघायला मिळत आहे. पावसामुळे कल्याण पूर्व लोकग्राम परिसरातील चाळीतील घराचे छत कोसळले. कल्याण पूर्वेच्या जयप्रकाश नगर परिसरात ही घटना घडली. पावसामुळे घराचा पत्रा कोसळला. त्यामुळे कुटुंबातील चार जण जखमी झाले. पीडित कुटुंब हे दुपारी घरी झोपलेले असताना घराचं छत त्यांच्यावर कोसळलं. जखमींमध्ये 13 वर्षीय मुलाचादेखील समावेश आहे. तर दोन लहान मुलं किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, कल्याण डोंबिवलीला आज दुपारनंतर पावसाने चांगलंच झोडपून काढले. अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. कल्याणच्या दुर्गाडी चौक आणि कल्याण पूर्व येथील चक्कीनाका चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग काढत वाहन चालवावं लागलं. तर सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण कोळशेवाडी, लोकग्राम परिसरातील चाळीतील घराचे छत कोसळ्याने चार जण जखमी झाले आहेत. तर कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात पावसामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.

सायंकाळी शाळेतून सुटलेली विद्यार्थ्यांना अक्षरशः गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. म्हारळ गावामध्ये ग्रामपंचायतकडून तयार करण्यात आलेले रस्ते अर्धवट आहेत. शिवाय इथे बांधण्यात आलेल्या नाले हे अरुंद आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हे सर्व पाणी म्हारळ गावामध्ये साचत असल्याचे सांगितले जात आहे. दुपारनंतर दोन ते तीन तासाच्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत केले आहे.