संजय सरोदे, प्रतिनिधी - टीव्ही 9 मराठी, जालना | 20 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज अंतरवलीतून मुंबईकडे मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला सुरुवात होण्याआधी मनोर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आता मागे हटायचं नाही, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यात पाणी आलं.
शेकडो माता-माऊलींच्या कपाळाला कुंकू राहिलं नाही. इतका निर्दयीपणा या सरकारच्या मनात असू शकतो. आता या सरकारला नीट केल्याशिवाय मराठ्यांना शांत बसून चालणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाने सरकारला 7 महिने वेळ दिला. आरक्षण मुंबईत आहे आणि घेतल्या शिवाय राहणार नाही. मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून आपण मुंबईला जात आहोत, असं जरांगे म्हणाले.
मी असेल नसेल विचार जागे ठेवा. 26 तारखेला घरा घरातील मराठा समाजाने मुंबईला यावं. मुंबई जाताना सर्वांनी शांततेत चला. सरकार सोबत बोलणं झालं नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.
आम्ही आमचे टप्पे पाडले आहेत. मी इथून एकटा निघालो तरी मुंबईमध्ये करोडो मराठा बांधव असणार आहेत. आम्ही चारी बाजूने लढणार आहोत. ही शेवटची लढाई आहे, असंही जरांगे म्हणाले.