देशी गाय ‘राज्य माता’ घोषित, महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; निवडणुकीआधी मोठी खेळी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत देशी गायींना राज्य मातेचा दर्जा देण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्वीकारून तातडीने जीआरही काढण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन मास्टर स्ट्रोक लगावल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत गायीला राज्य माता- गोमातेचा दर्जा घोषित केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आल्याने शिंदे सरकारचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचं मानलं जात आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांनी स्वागतही केलं आहे.
आज कॅबिनेटची बैठक झाली. यावेळी राज्यातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा जीआरही काढण्यात आला आहे. भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे. त्याचा हवाला देऊनच सरकारने हा निर्णय घेतला आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यात देशी गायी घटल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
गायीचं महत्त्व अद्वितीय
प्राचीन काळात माणसाच्या जीवनात गायीचं अद्वितीय महत्त्व होतं. वैदिक काळात गायींना धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे गायीला कामधेनूही म्हटलं गेलं. राज्यातील विविध भागात गायीच्या विविध प्रजाती आढळतात. मराठवाड्यात देवनी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी आणि विदर्भात गवलाऊ आदी जाती आढळतात. पण राज्यात दिवसेंदिवस गायींची संख्याही कमी होताना दिसत असल्याचं जीआरमध्ये म्हटलं आहे.
गायीलाच दर्जा का?
देशी गायीचं दूध पौष्टीक असतं. मानवी पोषणासाठी देशी गायीचं दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. मानवी आहारातील दूधाचं महत्त्व, आयुर्वेद चिकित्सेतील पंचगव्याचं महत्त्व, जैविक शेतीसाठी शेण आणि गोमूत्राचं महत्त्व पाहता गायीला राज्यमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निर्णयाचं स्वागत
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेने स्वागत केलं आहे. राज्य सरकारने गाईंना राज्यमाता दर्जा दिल्याने विश्व हिंदू परिषदेकडून सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गायींना आता संरक्षण प्राप्त होईल. गेली अनेक वर्षे या निर्णयासाठी विश्व हिंदू परिषद संघर्ष करत होती, मागणीला यश आलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून अभिनंदन करणार आहेत, असं विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री विंद शेंडे यांनी म्हटलं आहे.