Weather Update : राज्यात पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऐन थंडीत गारपीटीमुळे बळीराजा धास्तावला

| Updated on: Feb 18, 2021 | 7:46 AM

अचानक रात्रीच्या वेळी विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. रात्री 1 नंतर पावसाला सुरुवात झाली असून पावसामुळे अनेक भागातील लाईट गेली.

Weather Update : राज्यात पावसाचा कहर, या जिल्ह्यांमध्ये ऐन थंडीत गारपीटीमुळे बळीराजा धास्तावला
अतिवृष्टीचा इशारा
Follow us on

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. चक्क हिवाळ्यात सांगली आणि मिरज शहरात अचानक जोरदार गारांचा पाऊस पडला आहे. अचानक रात्रीच्या वेळी विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. रात्री 1 नंतर पावसाला सुरुवात झाली असून पावसामुळे अनेक भागातील लाईट गेली. या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिवाळ्यामुळे आधीच वातावरण थंड आहे त्यात पाऊस पडल्याने वातावरणात आणखी गारवा पसरला आहे. (maharashtra Weather report heavy rain in many districts with hailstorm imp alert)

परभणी शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणीही रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तसेच काही भागात गाराही बरसल्या. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने येत्या काही दिवसांत पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याचं वृत्त असून काही ठिकाणी गाराही बरसल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतीतील ज्वारी, गहू, हरबरा हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

राज्यात गोंदिया जिल्ह्यातही अनेक तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊसासह गारांचा पाऊस पडला. यामुळे पिकांना मोठा फटका पडण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा , तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

पंढरपुरातही रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. वादळी वारा, विजेचा कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, डाळिंब, ज्वारीसह रब्बी पिकाला धोका आहे. यामुळे द्राक्ष बागायतदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता असून बळीराजा धास्तावला आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज म्हणजे 18 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्या मालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?

18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.

शेतकऱ्यांनी नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. (maharashtra Weather report heavy rain in many districts with hailstorm imp alert)

संबंधित बातम्या – 

Weather Alert : जे कधीच नाही ते घडतंय? ईशान्य भारतात फेब्रुवारीत का पाऊस पडतोय?

Weather Alert : पुढचे 3 दिवस राज्यासाठी धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून इशारा

(maharashtra Weather report heavy rain in many districts with hailstorm imp alert)