Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाले आहे. त्यांनी आता त्यांनी आरक्षणाची लढाई ही फायनल मॅच असणार असल्याचे सांगितले. एकतर आम्ही जणार किंवा सरकार जाणार? अशा इशारा त्यांनी दिला. मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही गोड बोलून तर आमचा काटा काढला. पण आम्ही सुद्धा तुम्हाला खेटू आणि आरक्षण घेऊ राहू. मी गोडीत सांगतो, यापुढे आंदोलन लोकशाहीतच होणार आहे. पण मॅच फायनल असणार आहे. एकतर आम्ही जाणार किंवा सरकार जाणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
मनोज जरांगे म्हणाले, आता यापुढे कमी सांगायचे आणि कमी बोलायचे, पण आता करून दाखवायचे आहे. म्हणजे आता इथून पुढे सरकारची चाल खेळावी लागणार आहे. सरकार सुद्धा निवडून येईपर्यंत काही कळू देत नाही बोलू देत नाही. फक्त गोड बोलते. आता अचानक आंदोलन करायचे आहे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही. सरकार निवडून येईपर्यंत किती पाया पडत होता. किती लाडक्या बहिणींना पैसे दिले. पण आता निकष लावून लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे. सरकार गोरगरिबांना कळू देत नाही. शेवटी बहीण ही बहीण असते, त्यामुळे तिला आता का योजनेतून बाहेर काढले जात आहे.
मी आरक्षण मागतोय म्हणजे मला विनाकारण जातीवादी ठरवू नका. तुम्ही मागितला त्यावेळी आम्ही तुम्हाला जातीवादी नाही म्हणलो. फक्त गरिबांच्या लेकरांसाठी आरक्षण लागत म्हणून मागत आहे. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करताय म्हणजे तुम्ही जातीवादी आहे. शंभर टक्के सरकारकडून फसवणूक झालेली आहे. योग्य वेळी योग्य होणे गरजेचे होते. त्यावेळी आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचे होते आणि ओबीसींचा कायदा जर दुरुस्त करायचा असला तर त्याची अधिसूचना काढावी लागते. त्यावेळी त्यांनी अधिसूचना काढण्यास विलंब केला. त्यामुळे तिथे आमची फसवणूक झाली.
आता डाव कसे टाकायचे? हे आम्हाला चांगले माहीत आहे. परंतु आरक्षण आम्ही घेणारच आहे. अजून थोडे थांबू, पण तयारी अशी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
आता खूप ऊन आहे नाहीतर त्यांना आताच हिचका दाखवला असता. मागच्या वेळी मुंबईला गेलो आणि सुखरूप परत आलो. नाहीतर त्यांना तेव्हाच झटका दाखवला असता. आम्ही काय मुंबईला जाऊ नाही का? आम्हालाही बघायचं आहे मंत्री कुठे राहतो, आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना सुद्धा मुंबई बघू नाही का? त्यांनाही बघावी वाटते. आमचा मुंबईला जाण्याचा विचार थोडा थोडा चालू आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझ डाव सांगणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.