Mansukh Hiren Case : मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास अखेर NIA कडे, ठाणे सत्र न्यायालयाकडून हत्सांतरणाचे आदेश, ATS ला झटका
ठाणे सत्र न्यायालयाने हे प्रकरण NIAकडे वर्ग करण्याचे आदेश ATSला दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाता ATSला मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा ATSच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला असला, तरी ATSने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठोस काही सांगण्यात आलं नव्हतं. अशावेळी ठाणे सत्र न्यायालयाने हे प्रकरण NIAकडे वर्ग करण्याचे आदेश ATSला दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाता ATSला मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. आता NIA सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहे.(Thane Sessions Court orders ATS to hand over Mansukh Hiren murder case to NIA)
आरोपींची कोठडीही NIAला द्या- कोर्ट
मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेले आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गौर यांची कस्टडीही एनआयएला द्यावी, असे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. तसंच सर्व कागदपत्रही आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत NIAकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाणे सत्र न्यायालयाने दुपारी 3. 40 वाजता मनसुख हिरेन प्रकरण NIAकडे सोपवण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केलं. आतापर्यंतची सर्व कागदपत्रे NIAकेड हस्तांतरित करण्याचे आदेशही ATSला देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात ATSला मोठा झटका बसला आहे. 20 मार्च रोजी या प्रकरणाचा तपास NIAकडे देण्याचे अधिकृत आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले होते. पण अद्याप ATSचं या प्रकरणाचा तपास करत होती. दरम्यान, मंगळवारी ATSचे प्रमुख जयजित सिंग यांनी एक पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची सध्याची स्थिती सांगितली होती.
जयजित सिंग यांनी काय सांगितलं?
“दिनांक 6 मार्च रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग केला. 7 मार्च रोजी याबाबतची कागदपत्रं आम्ही ताब्यात घेतली. त्यानंतर त्याच दिवशी आम्ही विमला हिरेन यांचा जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांनीच आपल्या पतीचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला. त्यामुळे आम्ही त्याच दिवशी खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा आम्ही तपास सुरू केला. आम्ही घटनास्थळी म्हणजे मुंब्रा खाडी परिसरात गेलो. तिथे आम्हाला काहीच पुरावे आढळले नाही. मृतदेहाच्या अंगावरही पुरावे आढळले नाही”, असं सिंग म्हणाले.
वाझेंनी आरोप फेटाळले
8 मार्च रोजी आम्ही सचिन वाझेंचा या प्रकरणी जबाब नोंदवला. यावेळी वाझेंनी सर्व आरोप फेटाळून लावले. स्कॉर्पिओ गाडी आपल्या ताब्यात नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच हिरेनशी कोणतीही ओळख नसल्याचंही स्पष्ट केलं. वाझेंनी या गुन्ह्यात आपला सहभाग नसल्याचंही स्पष्ट केलं. मात्र, आम्हाला काही पुरावे मिळाले असून तपास सुरू आहे. वाझे यांचा या गुन्ह्यात नेमका काय सहभाग आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत, असं जयजित सिंग म्हणाले.
संबंधित बातम्या :
मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली?, कुणी केली? वाझेंचा संबंध काय?; वाचा, ATS नं काय सांगितलं?
Thane Sessions Court orders ATS to hand over Mansukh Hiren murder case to NIA