जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक
जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेत असताना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला ३ कोटींची मागणी करत होती. या घटनेने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटींची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे. सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे सध्या मंत्रिमंडळात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री आहेत. 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले होते, असे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर जयकुमार गोरे यांना अटक होऊन दहा दिवस जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला होता.
2016 मध्ये जयकुमार गोरे यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणाची कुठेही चर्चा नव्हती. मात्र संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आले. त्यामुळे तिने पुन्हा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर संबंधित महिलेनं पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती.
जयकुमार गोरे यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणानंतर जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिले होते. माझ्यावर 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे हा खटला सुरु होता. 2019 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्या निकालाची प्रत माझ्याकडे आहे. मला या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यावेळी न्यायालयाने मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते. लोकशाहीत न्यायालय सर्वोच्च असते. तुम्हीही (पत्रकार) त्यापेक्षा मोठे नाही. हा निकाल येऊन सहा वर्षे झाली आहेत. किमान कुठल्यावेळी विषय समोर आणावा, याला राजकीय लोकांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असे मला वाटते, असे जयकुमार गोरे म्हणाले होते.
मी सामान्य कुटुंबातून आलो आहे. माझ्या वडिलांचं सात दिवसांपूर्वी निधन झालं. मला भावनिक विषय करायचा नाही. पण ज्या वडिलांना मला संघर्ष करुन मोठं केलं, वाढवलं त्यांच्या मृत्यूनंतर मला अस्थीविसर्जनही करुन देण्यात आले नाही. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधक करतील, ही अपेक्षा मला नव्हती. पण शेवटी राजकारणात अशा गोष्टी होत असतात. मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे माझी जबाबदारी आहे, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले होते.