RaJ thackrey : महाराष्ट्र सैनिकांनो, आता हे आंदोलन… राज ठाकरे यांचा नवा आदेश काय? फेसबुक पोस्ट व्हायरल
गुढी पाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील मैदानातून मनसैनिकांना मार्गदर्शन केलं होतं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला होता. त्यातच त्यांनी मराठीचा विषयही लावून धरला होता. बँकामध्ये मराठीतून कामकाज होत नाही. बँकांमध्ये मराठीचा वापर होत नाही. त्यामुळे बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे, असे आदेशच राज ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकांमध्ये जाऊन हिंदी, इंग्रजीतील बोर्ड उतरवले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे. त्यासाठी बँकेत जा… असे आदेशच मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन मराठी भाषेचा वापर करण्यासाठी बँक मॅनेजरला निवेदन दिलं होतं. तसेच बँकांमधील हिंदी आणि इंग्रजीचे बोर्ड उतवरण्यात आले होते. राज्यातील सर्वच जिल्ह्यात हे आंदोलन सुरू होतं. तसेच अनेक बँकामध्ये मराठीचा वापरही सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक मनसैनिकांच्या नावाने एक पत्रक फेसबुकवर टाकलं आहे. तसेच या आंदोलनाबाबतची नवीन सूचनाही आपल्या सैनिकांना राज ठाकरे यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांचं पत्र जसंच्या तसं
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना.. सस्नेह जय महाराष्ट्र.
सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.
पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ?
आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की.
त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील !
आपला, राज ठाकरे