मनसे कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? बाळा नांदगावकर यांचं सूचक वक्तव्य
अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जय मालोकार यांच्या मृत्यूवर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली.
अकोल्यात दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या खोचक टीकेमुळे मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडल्यानंतर अकोल्यातील जय मालोकार नावाच्या कार्यकर्त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. जय मालोकार हा सुद्धा अमोल मिटकरी यांची गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होता. पण त्याचदिवशी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. जय मालोकार याच्या मृत्यूमुळे मनसेत शोककळा पसरली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांची जय मालोकर याच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. जय मालोकर याच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? या विषयावर बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक वक्तव्य केलं.
“ही घटना घडल्यानंतर जयच्या घरच्यांची अमित ठाकरेंनी भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये जे वाक्य बोलले होते ते वाक्य त्यांनी वेगळ्या अँगलने घ्यायला पाहिजे होतं. राज ठाकरे बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात. अजित दादा बोलल्यानंतर राजसाहेब बोलतात. असं वाकयुद्ध चालूच असतं. त्या मृत्यूला जबाबदार कोण आहे हे महत्त्वाचं आहे? विधान परिषदेतल्या आमदाराने बोलताना विचार करायला हवा होता. आपण बोलताना कोणावर बोलतोय, आपली उंची काय, याचा विचार केला पाहिजे”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
‘अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर बोलायला नको होतं’
“स्वतः मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच इतरांवर बोलू शकतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मी बोलू शकत नाही. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर बोलायला नको होतं. त्यांनी त्यांच्या अजित पवारांकडे विषय टाकला पाहिजे होता. याशिवाय अमोल मिटकरी एवढे होऊन देखील माझ्यासोबत कोणी नाही असं म्हणत आहेत. याच्यात त्यांना कळलं पाहिजे”, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला.
‘कोण जबाबदार? त्यापेक्षा विषयी कुठून उद्भवला?’
“कोण जबाबदार? त्यापेक्षा विषयी कुठून उद्भवला? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांना किती काय बोलायचे, त्यावेळेस काय लढाया व्हायच्या का? कोण जबाबदार यावरती मी जात नाही. यावर पोलीस खात्याचा कॉल आहे. ते चौकशी करत आहेत. या असल्या वागण्यामुळे आमचा माणूस गेला त्याचं काय करायचं?”, अशी खंत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली. “या विषयावर मला आता अधिक बोलायचं नाही. तोंड दिलेलं आहे म्हणून काहीही बोलायचं नाही. अमोल मिटकरी हा खूप मोठा माणूस आहे. त्याच्यावर बोलण्या इतका मी मोठा माणूस नाही”, असा टोला देखील बाळा नांदगावकर यांनी लगावला.