ताई तू काळजी करू नकोस… मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल; लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज काय?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यसरकारने अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील त्यापैकीच एक असून त्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत.
अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यसरकारने अनेक घोषणा केल्या. त्यापैकी एक घोषणा होती ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’.. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली, योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान आता या योजनेसंदर्भात आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. राज्यभरातील महिलांची वाढती गर्दी आणि प्रतिसाद पाहून सरकारने आता या योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अधिकृत व्हिडीओ शेअर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘ ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, ताई कुणालाही किती विरोधात बोलू देत, तू काळजी करू नकोस, राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावानं घेतला आहे.
या योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आणि नावनोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. ज्या भगिनी 31 ला नोंदणी करतील, त्यांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे’ असे मुख्यमंत्र्यांनी या व्हिडीओत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
View this post on Instagram
अशी आहे योजना…
या योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1) रेशन कार्ड 2) मतदार ओळखपत्र 3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4) जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.
सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
बाहेरच्या जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा 1) जन्म दाखला 2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3) आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?
– आधारकार्ड
– रेशनकार्ड
– उत्पन्नाचा दाखला
– रहिवासी दाखला
– बँक पासबुक
– अर्जदाराचा फोटो
– अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
– लग्नाचे प्रमाणपत्र