संतोष देशमुख हत्येप्रकरणात मुंबईत जनआक्रोश मोर्चा; न्याय हक्कासाठी मोठं जनआंदोलन, मेट्रो सिनेमापासून आंदोलनाला सुरूवात
Santosh Deshmukh Mumbai Janakrosh Morcha : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात मुंबईत जनआक्रोश मोर्चाला सुरूवात होत आहे. परभणी, बीड, धाराशिव, पैठण, छत्रपती संभाजीनगर, वाशिमनंतर मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात मुंबईत जनआक्रोश मोर्चाला अगदी थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असेल. या मोर्चासाठी मुंबईच नाही तर राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. अठरापगड जातीचे लोक या मोर्चासाठी येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. परभणी, बीड, धाराशिव, पैठण, छत्रपती संभाजीनगर, वाशिमनंतर मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या
संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. राज्यात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या. आरोपींना फाशी द्या अशी विनंती करण्यात आली आहे. दादागिरी चालणार नाही, न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा करण्यात येत आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला करणारा आरोपी लागलीच पकडण्यात येतो. पण संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला आहे.




बहिणीचा आक्रोश ऐका
भावाचा खून होऊन दोन महिने झाले तरी आरोपींना का अटक होत नाही, असा सवाल संतोष देशमुख यांच्या बहिणीने विचारला आहे. या बहिणीचा आक्रोश सरकारला दिसत नाही का, असे त्या म्हणाल्या. वैभवी देशमुख ही इयत्ता 12 मध्ये आहे, लहान मुलगा आहे. लहान भाऊ सलाईन लावल्यानंतर मोर्चात आला आहे. आपली तब्येत ठीक नसते, तरीही सरकार न्याय देण्यासाठी उशीर लावत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आम्हाला न्याय मिळावा हीच मागणी
आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. जे सराईत आरोपी आहेत. सराईत गुन्हेगार आहेत. या सर्वांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा हीच आमची मुख्य मागणी आहे. आमचे अनेक मोर्चे निघाले. आमचे एकच आव्हान आहे की शांततेत मोर्चे पार पडले पाहिजे आपल्या न्यायच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. यामध्ये कोणी असेल त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले आहेत. ही गुन्हेगारांची गँग आहे. शेवटचा आरोपी संपेपर्यंत आम्ही थांबणार नाही. त्यांना फाशी शिक्षा दिली जावी. या संदर्भात त्यांनी जे तपासणी यंत्रणा राबवलेली आहे तर ते काम करत आहेत आणि आम्ही त्यांच्यावर पण विश्वास ठेवून आहोत की योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.