शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी महायुतीमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्या म्हणाल्या, सध्या देवेंद्र फडणवीस यांना वेटींगवर ठेवले जाते आहे. आपण जर बघितले तर नवनीत राणा यांना एका तासात भेट मिळते, तिथे दोन दोन दिवस देवंद्र फडणवीस यांना वेटींगवर ठेवले जाते. आत्ताची जी माहिती मिळते आहे, त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी भाजपच स्वतः सक्रिय झाल्याचे दिसत आहे. भाजप सक्रिय होवून भाजपमधीलच काही लोक गडकरी साहेबांचे नाव पुढे आणत आहेत. काही लोक विनोद तावडे यांचे नाव पुढे आणत आहेत.
फडणवीस यांनी स्वतः राज्यात भस्मासुर वाढवला आहे. आता तो भस्मासुर त्यांच्याच डोक्यावर हात ठेवले की काय अशी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर बसवले, तेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी अनेक कुल्पत्या चालू आहेत. हे आता बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात आले आहे.
सध्या महायुतीचे ग्रहमान चांगले नाही. ते काहीही करायला गेले तर त्याच्या उलट होते. लाडकी बहीण योजनेची जाहिरात केल्या गेल्या. त्यासाठी वारेमाप पैसा उधळला गेला. जसे एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे वावर विकून लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहे. देवेंद्र फडणवीस आपला रेशीम बागेतील बंगला विकूनच पैसे खर्च केले की काय असे वाटत आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रचार सुरु असताना बदलापूरच्या घटना घडली. त्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला. यामुळे महायुतीसाठी दिवस चांगले नाही.
अक्षय शिंदे हा कोणी साधू संत महात्मा नव्हता. तो मरायलाच पाहिजे होता. मात्र, त्याला अशा पद्धतीने इनकाउंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येता येणार नाही. शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी जीव घेतला, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. महाराष्ट्रात आमचे सरकार येईल. ते सरकार आल्यावर सरकारच्या मंत्री मंडळात रोहित पवार यांच्यासारखा एक उमदा माणूस असेल तर बिघडले कुठे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.