VIDEO | पगार रखडले, कुठे आहेत सदावर्ते? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!

| Updated on: Feb 15, 2023 | 11:47 PM

आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत व्हायचा. पण कोरोनात एसटी बंद झाली, आणि पगाराच्या तारखेचं वेळापत्रक विस्कटलं.

VIDEO | पगार रखडले, कुठे आहेत सदावर्ते? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!
Follow us on

मुंबई : एसटी संपानंतर कोर्टात हमीपत्र देऊनही कर्मचाऱ्यांच्या पगारात विलंब होतोय. यावरुन कोर्टात दिलेल्या हमीपत्राचं काय झालं, असा प्रश्न एसटी कर्मचारी करतायत. तर सदावर्ते आणि सदाभाऊ यावर का बोलत नाहीत, असाही प्रश्न आंदोलकांनी केलाय. 7 महिन्यांपूर्वीचे विरोधक आता सत्तेत येऊनही एसटी कर्मचाऱ्यांचे हाल का, असा प्रश्न एसटी कर्मचारी विचारु लागलेयत. कारण, कोर्टाच्या आदेशानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उशिरानं होतोय.

यावर जे संघटनाचे राजकीय पदाधिकारी आरोप करतायत. त्यांना सदावर्ते आता कमिशनखोर म्हणून लागले आहेत. एसटी संपाचं आंदोलन पुकारणारे सदाभाऊ, सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांची आता काय भूमिका आहे, हे पाहण्याआधी एसटी कर्मचाऱ्यांची तक्रार काय, ते पाहूयात.

आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत व्हायचा. पण कोरोनात एसटी बंद झाली., आणि पगाराच्या तारखेचं वेळापत्रक विस्कटलं. नंतर मविआ सरकारवेळी वकील सदावर्ते, भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी एसटी संपाचं आंदोलन छेडलं.

त्या आंदोलनात अनेक मुद्द्यांवर तोडगा काढताना एसटीवाल्यांचे पगार दर महिन्याच्या ७ तारखेच्या आत होतील, असं आश्वासन सरकारनं कोर्टाला दिलं. त्यासाठी सरकारनं महामंडळाला दर महिना साडे तीनशे कोटी रुपये देणं सुरु केलं.

मात्र मागच्या ४ महिन्यांपासून त्यात कपात झाल्यामुळेच डिसेंबरपासून पगारात विलंब होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे. त्याचा परिणाम म्हणून १५ फेब्रुवारी उजाळूनही जानेवारीचा पगार झालेला नाही. संपावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असं म्हणणारे सदावर्ते आता पगार विलंबामागे सरकारचा दोष नसून अधिकारी चूकत असल्याचं म्हणतायत.

याआधी तातडीनं प्रश्न निकाली काढा असं म्हणणारे सदाभाऊ खोत आता पुढच्या आठवड्यात मंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं म्हणतायत. सरकार बदललंय पण एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या बदललेल्या नाहीत. विरोधात असताना सदाभाऊ-सदावर्ते-पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचा दाखला देत होते,
पण सत्ता बदलूनही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.

संपावेळी तातडीनं विलीनकरण करा असं म्हणणारे वकील सदावर्ते आता मात्र विलिनीकरण लढा आहे., असं म्हणत सबुरीचं उत्तर देतायत. आता मात्र एसटी संपात आमचा फक्त वापर झाल्याचा आरोप काही एसटी कर्मचारी करतायत.

मविआ सरकार पाडायचंच होतं, असं विधान याआधी सदावर्तेंनी केलंय आणि ते फेटाळून लावत फक्त एसटी कर्मचाऱ्यांचं हित हाच एसटी संपामागचा हेतू होता, असं सदाभाऊ खोत म्हणतायत.

संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार जरुर वाढले यात तिळमात्र शंका नाही. मात्र जेव्हा-केव्हा व्यवस्था चुकत असेल, तेव्हा-तेव्हा कष्टकऱ्यांचे पुढारी म्हणणाऱ्यांनी सरकार आणि अधिकारी असा बुद्धीभेद न करता कष्टकऱ्यांच्या पाठिशी उभं राहावं, अशी भावना एसटी कर्मचाऱ्यांची आहे.