Mumbai Corona Update : कोविड बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या तातडीने वाढवा, महापालिका आयुक्तांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना
आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये आणि सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबई : मुंबई महानगरात मागील काही दिवसांमध्ये कोविड विषाणू (Corona Virus) बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा (Monsoon) सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये आणि सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Chahal) यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 विषाणू बाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची बैठक घेतली. याप्रसंगी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इतर सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
‘चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही’
चहल म्हणाले की, कानपूर IIT तज्ज्ञांनी जुलै 2022 मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक बाबींवर पुन्हा एकदा विशेषत्वाने लक्ष देणे गरजेचे आहे. सोबतच, आता पावसाळादेखील सुरु होणार आहे. पावसाळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहून त्याची सक्त अंमलबजावणी होणे देखील गरजेचे आहे.



कोविड आणि मॉन्सून या दोन्ही परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे आवश्यक ती सर्व यंत्रणा आहे. असं असलं तरी त्याचा नियमितपणे आढावा घेणे आणि यंत्रणा सुसज्ज राखणे गरजेचे आहे. दक्षता म्हणून काही बाबी प्राधान्याने करावयाच्या आहेत, असे सांगून डॉ. चहल यांनी निर्देश दिले.
महापालिका आयुक्तांचे यंत्रणांना निर्देश
- मुंबई महानगरात सध्या होत असलेली कोविड चाचण्यांची प्रतिदिन संख्या 8 हजार इतकी असून ती प्रतिदिन 30 ते 40 हजार पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. कारण सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण 8 टक्क्यांपर्यंत पोहोचले असून हा दर सावधानतेचा इशारा देणारा आहे. चाचण्यांची संख्या वाढली तर त्यामुळे जास्तीत-जास्त बाधितांचा शोध घेणे सोपे होईल, परिणामी संसर्गाला अटकाव करता येईल.
- सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी जिथे जिथे कोविड बाधित आढळतील, तिथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढवावी. संबंधित बाधित रुग्णांचा संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करावी.
- ज्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये बाधित आढळतील, त्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये सर्व रहिवाशांची सामूहिक कोविड चाचणी करावी. तसेच त्या इमारती / गृहनिर्माण संस्था लवकरात लवकर संसर्गमुक्त होतील, यावर लक्ष केंद्रीत करावे.
- अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी सर्व वैद्यकीय प्रयोगशाळा संचालकांसमवेत बैठक घेतली आहे. या सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात यावेत आणि वाढीव संख्येने चाचण्या करण्याची क्षमता राखावी, अशा सूचना पुन्हा एकदा देण्यात याव्यात.
- वैद्यकीय प्रयोगशाळांनी कोणत्याही रुग्णाला कोविड बाधित असल्याचा अहवाल परस्पर देऊ नये. दैनंदिन कोविड बाधितांचे सर्व अहवाल फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठवावेत. या बाबीचे उल्लंघन केल्यास संबंधित वैद्यकीय प्रयोगशाळेवर सक्त कारवाई केली जाईल.
- महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षात देखील पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहील, असे नियोजन करावे. जेणेकरुन, दैनंदिन बाधित रुग्णांची प्राप्त होणारी यादी प्रशायकीय विभागनिहाय स्वतंत्र करुन संबंधित सर्व विभाग नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) कडे पाठविता येईल.
- सर्व विभाग नियंत्रण कक्षांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रणा, साधनसामग्री उपलब्ध आहे किंवा कसे याचा संबंधित सहायक आयुक्तांनी आढावा घ्यावा आणि नियंत्रण कक्ष सुसज्ज राखावे. प्रत्येक नियंत्रण कक्षासाठी गरजेइतक्या रुग्णवाहिका नेमण्यात याव्यात. सर्व संबंधित परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त आणि संचालक (आपत्ती व्यवस्थापन) यांनी देखील याबाबत पडताळणी करावी. तसेच आवश्यक सहाय्य पुरवावे.
- सर्व भव्य कोविड रुग्णालयांना (जम्बो कोविड सेंटर) सतर्क राहण्याची सूचना करण्यात येत असून रुग्ण दाखल करुन घेता येईल, अशारितीने सुसज्ज यंत्रणा, वैद्यकीय मनुष्यबळ व इतर कर्मचारी नेमण्यात यावेत. विशेषतः अतिदक्षता उपचारांच्या रुग्णशय्या आणि त्यासाठी लागणारी वैद्यकीय संयंत्रे उपलब्ध ठेवावीत. जेणेकरुन रुग्णसंख्या वाढली तर, अडचण होऊ नये.
- सर्व भव्य कोविड रुग्णालयांची संरचनात्मक तपासणी करुन पावसाळी परिस्थितीत संरचनेचा कोणताही धोका उद्भवणार नाही, याची खातरजमा करावी, त्यासाठी संबंधित कोविड रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि परिमंडळांचे उप आयुक्त यांनी समन्वय राखून कार्यवाही पूर्ण करावी व संरचना स्थिरता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. पावसाळी पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा देखील तैनात करावी.
- महानगरपालिकेच्या सर्व नियमित प्रमुख रुग्णालयांनी वाढीव रुग्णसंख्या दाखल करुन घेता येईल व त्यांच्यावर योग्य उपचार होतील, अशारितीने तयारी करावी. तसेच सर्व खासगी रुग्णालयांनादेखील आपापल्या स्तरावर सर्व तयारी करुन सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले जावेत.
- मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत सर्व रुग्णालयांनी गरजेइतका औषधसाठा खरेदी करुन उपलब्ध करुन घ्यावा.
- कोविड विषाणूचे जनुकीय सूत्र निर्धारण अर्थात जिनोम सिक्वेसिंग करण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु ठेवावी. जेणेकरुन विषाणूचा कोणताही नवीन उपप्रकार वेळीच निदर्शनास येईल.
- सर्व झोपडपट्टी परिसरांमध्ये नियमितपणे संसर्ग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी. विशेषतः झोपडपट्टयांमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये / शौचालयांमध्ये दिवसातून किमान 5 वेळा जंतुनाशक औषध फवारणी झालीच पाहिजे. जेणेकरुन, कोविडसह पावसाळी आजारांचा फैलाव रोखता येईल. या उपाययोजनांसाठी अधिकचा निधी आवश्यक असल्यास तो उपलब्ध करुन दिला जाईल.
- 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण जास्तीत-जास्त संख्येने करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. तसेच 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे देखील जलदगतीने लसीकरण करावे.
- वैद्यकीय औषधी दुकानांमधून विकले जाणाऱया सेल्फ टेस्टिंग कोविड कीटची आकडेवारी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त व्हावी, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यपद्धती सुनिश्चित करण्यात यावी.
- कोविड उपाययोजनांशी संबंधित तातडीचे प्रस्ताव, त्यांच्या नस्ती प्राधान्याने मार्गी लावाव्यात.
- पावसाळ्यात रस्त्यांवर होणारे खड्डे वेळेत भरले जावेत, यासाठी विभागीय नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून नागरी समस्यांची दखल घेतली जावी. त्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) व उप आयुक्त (पायाभूत सुविघा) यांनी आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करावी.
- सर्व रस्त्यांवरील / वाहिन्यांवरील झाकणे (मॅनहोल) व्यवस्थितरित्या आच्छादित आहेत, याची खातरजमा करण्यासाठी स्थानिक यंत्रणेला सर्व ठिकाणी निरिक्षण करण्याचे निर्देश देण्यात यावेत. पावसाळी पाणी साचण्याची ठिकाणे असलेल्या परिसरांमध्ये मॅनहोलच्या झाकणाखाली जाळी लावून सुरक्षिततेची अतिरिक्त उपाययोजना करण्यात यावी.
- संपूर्ण मुंबई महानगरात पावसाळी पाणी साचण्याची शक्यता असलेले 477 परिसर आहेत. या सर्व ठिकाणी पाणी उपसा करणारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी व त्याचे संचलन करण्यासाठी विशेष समन्वयकांची नेमणूक करावी. जेणेकरुन, संभाव्य पूरस्थिती असे समन्वयक स्वतःहून उपस्थित राहून यंत्रणा सांभाळतील.
- पावसाळा सुरु झाल्यानंतर, सर्व उपाययोजनांची प्रत्यक्ष व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे, तसेच पूरस्थिती अथवा नागरिकांना अडचणीची ठरु शकेल, अशी कोणतीही स्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेची सर्व संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर उतरुन कार्यान्वित आहे, याची खात्री करावी. जेणेकरुन, तातडीने समस्येचे निराकरण होऊ शकेल.
(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)