मुंबई महापालिकेची पावसाळा पूर्वीच्या कामांची तयारी सुरु, पाण्याच्या टाक्या डासमुक्त करण्यासाठी 40 दिवसांची डेडलाईन

सर्व शासकीय, निम-शासकीय यंत्रणांनी आपापल्‍या अखत्‍यारितील कार्यालये व परिसरांमध्‍ये पाण्‍याच्‍या टाक्‍या डास प्रतिबंधक करणे, निकामी-भंगार साहित्‍याची विल्‍हेवाट लावणे इत्‍यादी सर्व कामे 30 एप्रिल 2022 पूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिकेची पावसाळा पूर्वीच्या कामांची तयारी सुरु, पाण्याच्या टाक्या डासमुक्त करण्यासाठी 40 दिवसांची डेडलाईन
डासांचं नियंत्रण, पावसाळा पूर्वीच्या कामांसाठी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 8:59 PM

मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आता पावसाळ्यापूर्वीच्या कामाला लागली आहे. पाण्याच्या टाक्या डास अळीमुक्त करण्यासाठी यंत्रणांना 40 दिवसांची डेडलाईन देण्यात आलीय. तसंच झालेल्या कामांचे फोटो पाठवण्याचे निर्देशही देण्यात आलेत. सर्व शासकीय, निम-शासकीय यंत्रणांनी आपापल्‍या अखत्‍यारितील कार्यालये व परिसरांमध्‍ये पाण्‍याच्‍या टाक्‍या डास प्रतिबंधक (Mosquito Proof) करणे, निकामी-भंगार साहित्‍याची विल्‍हेवाट लावणे इत्‍यादी सर्व कामे 30 एप्रिल 2022 पूर्वी पूर्ण करावीत. तसेच कुठेही पाणी साचून डासांची उत्‍पत्‍ती होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal singh Chahal) यांनी दिले आहेत. कार्यवाही पूर्ण झालेल्या कामांची छायाचित्रे व्हॉट्सअप समुहामध्ये पाठविण्याची सूचनाही यावेळी आयुक्तांनी केली. येत्‍या पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर, बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये हिवताप (मलेरिया), डेंगी व तत्‍सम आजारांना प्रतिबंध म्‍हणून महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभाग व कीटकनाशक विभागाने नियमित उपाययोजना हाती घेतल्‍या आहेत. त्‍याचा एक भाग म्‍हणून आज महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त सुरेश काकाणी, उप आयुक्त संजय कुऱहाडे, कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांच्‍यासह राज्‍य सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्‍य रेल्‍वे, पश्चिम रेल्‍वे, म्‍हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्‍ट, लष्कर, नौदल, वायूदल, सैन्‍यदल अभियांत्रिकी सेवा, बेस्‍ट, डाक विभाग, एमटीएनएल, बीएसएनएल, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अशा शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे मिळून 51 प्रतिनिधी उपस्थित होते.

उपाययोजनांचं संगणकीय सादरीकरण

सुरुवातीला महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी सर्व शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणांच्‍या हद्दीतील मालमत्तांसह कार्यालय परिसरांमधील पाणी साठवण्याच्‍या टाक्‍या, शासकीय परिसरांमध्‍ये असलेले निकामी, निकृष्‍ट व भंगार साहित्‍याची ठिकाणे याबाबत केलेल्‍या सर्वेक्षणाची सांख्यिकी सादर केली. तसेच छायाचित्रांसह संगणकीय सादरीकरण देखील केले. ज्या-ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या अद्याप डास प्रतिबंधक करण्यात आलेल्या नाहीत, त्‍याबाबतची योग्‍य कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना या यंत्रणांना करण्‍यात आल्‍याचे नारिंग्रेकर यांनी नमूद केले. तसेच पाणी साचून डासांची उत्‍पत्‍ती होवू नये, यासाठी आवश्‍यक असलेल्‍या उपाययोजना दरवर्षी कशा केल्‍या जातात, त्‍याची माहितीही त्‍यांनी दिली.

‘डासांची उत्‍पत्‍ती रोखणे हा मूळ उद्देश’

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त सुरेश काकाणी यांनी प्रत्‍येक यंत्रणानिहाय कार्यवाहीचा सविस्‍तर आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी पाणी साठवण्‍याच्‍या टाक्‍यांचे डास प्रतिबंधन करणे आवश्‍यक आहे. पाण्‍याच्‍या टाक्‍यांची गळती रोखणे, टाक्‍यांना झाकण किंवा आच्छादन लावणे, कोठेही निकामी साहित्‍य व भंगार पडलेले असल्‍यास तेथे पाणी साचू न देणे, अशा साहित्‍याची योग्‍यरित्‍या विल्‍हेवाट लावणे आवश्‍यक आहे, अशी सूचना त्‍यांनी केली. कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबई महानगरामध्‍ये मागील काही वर्षांमध्‍ये हिवताप व डेंगी तसेच तत्‍सम आजार रोखण्‍यासाठी करण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजनांची माहिती दिली. या आजारांना रोखण्‍यासाठी नागरिकांसमवेतच सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे सहकार्य आवश्‍यक असून मुख्‍यत्‍वाने डासांची उत्‍पत्‍ती रोखणे, हा मूळ उद्देश असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

झालेल्या कामांचे फोटो तपासले जाणार

महानगरपालिका आयुक्‍त डॉ. चहल यांनी सविस्तर चर्चेनंतर सर्व यंत्रणांना विविध निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, ज्‍या यंत्रणांच्‍या हद्दीत पाणी साठवण्‍याच्‍या जागा व टाक्‍या यांचे डास प्रतिबंधन शिल्‍लक आहे, निकामी व भंगार साहित्याची विल्‍हेवाट लावलेली नाही, त्‍यांनी त्‍वरेने कार्यवाही सुरु करावी. 30 एप्रिल 2022 पर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण करुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. संबंधितांनी ही कार्यवाही पूर्ण केल्यानंतर त्याची छायाचित्रे व्हॉट्सअप समुहामध्ये पाठविणे आवश्यक असेल. महानगरपालिका कायद्यानुसार त्‍यांच्‍यावर योग्‍य ती कारवाई करण्यात येईल. कार्यवाही पूर्ण झाली आहे किंवा कसे, याबाबतचा आढावा घेण्‍यासाठी समितीची सभा पुन्‍हा घेण्‍यात येईल, असेही चहल यांनी नमूद केले.

डासंपासून बचावासाठी महत्वाची माहिती

  1. डासांचे आयुष्य हे साधारणपणे तीन ते सहा आठवड्यांचे असते. या आयुष्यात डासाची मादी साधारणपणे तीन वेळा अंडी घालते. प्रत्येक वेळी साधारणपणे 80 ते 100 अंडी घातली जातात. ही अंडी शुष्क अवस्थेतही साधारणपणे वर्षभरापर्यंत राहू शकतात. त्‍यानंतर जेव्हा पाण्याशी संपर्क येईल, तेव्हा ही अंडी फलित होऊ शकतात.
  2. मलेरिया व डेंगी पसरविणाऱया डासाची मादी ही आपली अंडी स्वच्छ व साचलेल्या पाण्यातच घालते. ही अंडी घालण्यासाठी चमचाभर साचलेले पाणी देखील पुरेसे असते. अंडी घातल्यापासून साधारणपणे आठवड्याभरात डासांची उत्पत्ती होते.
  3. फुलांचे परागकण, फळे वा इतर शर्करा असणारे पदार्थ हे नर डासांचे प्रमुख अन्न मानले जाते. तर रक्त हे मादी डासांचे अन्न असते व त्यामधील प्रथिनांची अंडी तयार होण्याकरिता आवश्यकता असते. या प्रथिनांसाठी डासाची मादी मानवाला चावते.
  4. मलेरिया, डेंगी यासारख्या रोगांचे परजीवी/विषाणू हे डासांच्या शरीरात असू शकतात. परजीवी/विषाणू वाहक असणारी डासाची मादी मानवाला चावल्यास त्या रोगांचे मानवात संक्रमण होते. डेंगीचे संक्रमण करणारी डासाची मादी ही मानवाला साधारणपणे दिवसा चावते, तर मलेरियाचे संक्रमण करणारी डासाची मादी ही बहुतांशी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चावते.
  5. डास चावू नये यासाठी मच्छरदाणीचा वापर करणे, मलम वापरणे, शरीर अधिकधिक झाकले जाईल असे कपडे वापरण्यासारख्या बाबींचा अवलंब करावा. तसेच महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खाते व कीटक नियंत्रण खात्याद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱया सूचनांचे कसोशीने पालन करावे.

इतर बातम्या :

VIDEO| मुंबईत Shivaji Park येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर MNS तर्फे पुष्पवृष्टी, राज ठाकरेंची उपस्थिती

Nalasopara | ‘ये XXX रोता क्यू है’, नालासोपाऱ्यात पादचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण, दोन माथेफिरु पसार

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.