आमदार लटकले, एक्सप्रेस रखडल्याने लोकप्रतिनिधी ‘ट्रॅक’वर, पायी प्रवास; कुणाकुणाला फटका?

| Updated on: Jul 08, 2024 | 10:40 AM

पावसामुळे अनेक आमदार अडकल्याने राज्याचे पावसाळी अधिवेशन उशिराने सुरु होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आमदार लटकले, एक्सप्रेस रखडल्याने लोकप्रतिनिधी ट्रॅकवर, पायी प्रवास; कुणाकुणाला फटका?
Follow us on

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईत काल रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक ही धीम्या गतीने सुरु आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अधिवेशनात जाणाऱ्या आमदारांनाही बसला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदार एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. त्यामुळे काही आमदारांनी रेल्वे रुळावरुन चालत प्रवास केला.

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी जाणाऱ्या काही आमदारांनाही मुंबईतील मुसळधार पवासाचा फटका बसला आहे. मुंबईतील मुसळधार पावासामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे हावडा एक्सप्रेस ही बऱ्याच काळापासून कुर्ला परिसरात अडकली आहे. या एक्सप्रेसने कॅबिनेट मंत्री अनिल पाटील, संजय गायकवाड, अमोल मिटकरी, जोगेंद्र कवाडे यांसह अनेक आमदार प्रवास करत होते. हे सर्व आमदार अधिवेशनसाठी मुंबईत निघाले होते.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत – अमोल मिटकरी

पण पावसामुळे या आमदारांना एक्सप्रेसमधून उतरुन पायी प्रवास करावा लागला. यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ शेअर करत परिस्थिती सांगितली आहे. दादर आणि कुर्ला स्थानकाच्या मध्ये राज्याचे मदत आणि पुर्नवसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मी आणि आणखी या ट्रेनमध्ये सात ते आठ आमदार अडकून आहेत. सध्या आम्ही एक वेगळा अनुभव घेत आहोत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज विधीमंडळ अधिवेशनचा अंतिम आठवडा सुरु आहे. त्या अधिवेशनात जाण्यासाठीही प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. लवकरच वाहतूक सेवा सुरळीत होईल, अशी अपेक्षा करतो. याचा सर्वसामान्य लोकांनाही फटका बसला आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.

रस्त्यावर पाणी साचल्याने तिथेही अडकण्याची शक्यता – संजय गायकवाड

आम्ही आता कुर्ला स्टेशनच्या मागे आहोत. माझ्या गाडीत इतरही काही आमदार आहेत. आमच्या गाडीच्या पुढे हावडा एक्सप्रेस अडकलेली आहे. मी अमरावती एक्सप्रेसने प्रवास करत आहे. अनेक आमदार पायी निघाले आहेत. पण पुढेही रस्त्यावर पाणी असल्याने काय करावं या विवंचनेत आम्ही सर्वजण आहोत. आज अधिवेशनात अतिशय महत्त्वाचे प्रश्न मांडले जाणार आहेत. काही लक्षवेधीही आहेत. काही बैठकादेखील होणार आहेत. त्यामुळे आम्ही केव्हा पोहोचू काहीही सांगता येत नाही. आम्हाला पायी चालायला काहीही हरकत नाही. पण रस्त्यावरही पाणी साचले आहे. त्यामुळे तिथेही अडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

दरम्यान पावसामुळे अनेक आमदार अडकल्याने राज्याचे पावसाळी अधिवेशन उशिराने सुरु होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.