RSS-BJP : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘संघ’ दक्ष; राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

| Updated on: Sep 03, 2024 | 3:02 PM

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

RSS-BJP : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संघ दक्ष; राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
भाजपचं संघ दक्ष
Follow us on

लोकसभेतील हाराकिरीमुळे भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जिव्हाळा जपला आहे. संघाशी जुळवून घेण्यात भाजपने पुढाकार घेतला आहे. दिल्लीत यापूर्वी बैठक झाली. त्यात संघाने अनेक बाबतीत मार्गदर्शन केले होते. त्यानंतर काही धोरणात्मक बदल पाहायला मिळाले. लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे भाजपची मुंबईसह महाराष्ट्रात पिछेहाट झाली होती. विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार असल्याचे समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संघ दक्ष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप आमदारांची बैठक नुकतीच झाली. मुंबईत ३६ मतदार संघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढणार असल्याचे समोर येत आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सहभागी असेल. विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बैठकीत काय ठरलं?

लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे भाजपची मुंबईसह महाराष्ट्रात पिछेहाट झाली होती. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये संघानं भाजपला एक हाती मदत केली. याच मदतीच्या जोरावर भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांचा आकडा ३१ वरून ८२ पर्यंत वाढला.

संघाच्या मदतीमुळे भाजपला मुंबईत २०१९च्या लोकसभेमध्ये ३ तर महायुतीला ६ जागांवर विजय मिळाला होता. तर विधानसभा निवडणुकीतही संघामुळे भाजपनं एकट्याच्या जीवावर १६ जागा जिंकल्या होत्या.

मात्र उर्दू भवनच्या मुद्द्यावरून टोकाचा विरोध असताना ही मुंबईत यामिनी जाधव यांना दिलेल्या उमेदवारीमुळे संघात कमालीची नाराजी होती. लोकसभा निवडणुकीत संघाने याच नाराजीमुळे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीला मुंबईत अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले.

लोकसभा निवडणुकीत मुंबईत ३ पैकी २ हातच्या जागा गमावल्यानंतर भाजपनं संघासमोर शरणागती पत्करली. येत्या निवडणुकीत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देताना संघाने भाजपच्या प्रत्येक स्तरावर हस्तक्षेप करण्याची अट घातली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित असलेल्या विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम आणि अशा सर्व आघाड्या आता महायुतीच्या उमेदवारांसाठी छुप्या व उघड पद्धतीनं काम करणार आहेत.

उमेदवार निवडीमध्ये संघ कुठलाही हस्तक्षेप करणार नाही; मात्र त्याचवेळी अजेंडा राबवताना कुठलीही तडजोड केली जाणार नाही, याचीही खात्री संघाने भाजपला दिल्याचे सूत्रांचं म्हणणं आहे.