Sanjay Raut : ननावरे पती-पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात शिंदे सरकारच्या दोन मंत्र्यांचा हात; संजय राऊत यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
उल्हासनगर येथील राहणारे नंदकुमार ननावरे यांनी पत्नीसह आत्महत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केल्याने अधिकच खळबळ उडाली आहे.
![Sanjay Raut : ननावरे पती-पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात शिंदे सरकारच्या दोन मंत्र्यांचा हात; संजय राऊत यांच्या गंभीर आरोपाने खळबळ Sanjay Raut : ननावरे पती-पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात शिंदे सरकारच्या दोन मंत्र्यांचा हात; संजय राऊत यांच्या गंभीर आरोपाने खळबळ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/sanjay-raut-2023-08-21T114606.526.jpg?w=1280)
मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : उल्हासनगर येथील रहिवासी नंदकुमार ननावरे यांनी पत्नीसह आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही पती-पत्नीला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेल्याचं सांगितलं जात आहे. न्याय मिळावा म्हणून नंदकुमार ननावरे यांच्या भावाने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरीराचा रोज एक अवयव कापून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आली आहे. आता या आत्महत्या प्रकरणात काँग्रेस आणि ठाकरे गटाने उडी घेतली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर या प्रकरणात शिंदे सरकारच्या दोन मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
ननावरे आत्महत्या प्रकरणात शिंदे सरकारमधील दोन मंत्री सामील आहेत. एक मुंबईचा मंत्री आहे. तर दुसरा मंत्री सातारा फलटणचा आहे. त्यामुळे उद्वेगाने त्याच्या भावाने बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवलं. या हाताने मी भाजपला मतदान केलं. ते बोटचं मी तोडलंय, असा ननावरे यांचा भाऊ म्हणाला. हे गंभीर आहे. तुम्हाला मन आहे की नाही? पंतप्रधान मन की बात करतात ती हवेतील आहे का? तरीही गृहमंत्र्यांना वेदना होत नसतील तर महाराष्ट्राचं दुर्देव आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
गृहमंत्र्यांनी ऐकून घेतलं असतं
या खुनात दोन मंत्री आहेत. आमच्यावर लहानसहान गोष्टींवरून आरोप करणारे आता कुठे आहेत? ननावरे यांच्या कुटुंबाविषयी आमच्या मनात वेदना आहे. सहानुभूती आहे. मृत कुटुंबाचा भाऊ बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवतो. जर माणुसकी असती तर त्या भावाला समोर बसून गृहमंत्र्यांनी त्यांचं ऐकून घेतलं असतं, असंही ते म्हणाले.
फडणवीस, लक्ष द्या
ननावरे आत्महत्या प्रकरणावर काँग्रेस नेते नसीम खान यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ननावरे यांनी मोदींचं नाव घेऊन बोट कापलं. आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारची बदनामी होत आहे. राज्य सरकारची कमी आणि मला वाटते की मोदींची जास्त बदनामी होत आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यायला हवं. चार आरोपींना तरी अटक झाली तरी न्याय मिळायला उशीर झालेला आहे, असं नसीम खान यांनी म्हटलं आहे.