सरकारला बहुमताचं डिप्रेशन, संजय राऊतांचा महायुतीला भीमटोला
Sanjay Raut attack on Sanjay Shirsat : खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे सेनेतून हल्लाबोल झाला. मंत्री संजय शिरसाट यांच्यापाठोपाठ दादा भुसे यांनी त्यांच्यावर तोफ डागली. शिरसाट यांनी तर जहाल वक्तव्य केले. त्याचा राऊतांनी आज समाचार घेतला.

गुवाहाटी, कामाख्या देवीचं मंदिर, वर्षा बंगला आणि रेड्याचं शिंगे हे राजकारणातील गेल्या दोन दिवसातील परवलीचे शब्द झाले आहेत. शिंदे सेनेला अंधश्रद्धेने पछाडले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा धास्तीने वर्षा बंगल्यात जात नसल्याचा घणाघात गेल्या दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत करत आहेत. त्यानंतर राऊत यांच्यावर शिंदे सेनेतून हल्लाबोल झाला. मंत्री संजय शिरसाट यांच्यापाठोपाठ दादा भुसे यांनी त्यांच्यावर तोफ डागली. शिरसाट यांनी तर जहाल वक्तव्य केले. त्याचा राऊतांनी आज समाचार घेतला.
या सरकारला विजयाचं डिप्रेशन
महायुती सरकारला विजयाचं, बहुमताचं डिप्रेशन आल्याचा चिमटा राऊतांनी काढला. यातून ते बाहेरच पडत नाहीत, हा अधिक गंभीर आजार आहे, असा टोला त्यांनी महायुतीला लगावला. चुकीच्या पद्धतीने मिळवलेला विजय आणि त्याचा धक्का न पचवता आल्याने त्यातून संजय शिरसाट, दादा भुसे असे वक्तव्य करत असल्याचे राऊत म्हणाले.




राऊतांची तुफान बॅटिंग
कामाख्या मंदिर आणि वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं पुरल्याचे आपले वक्तव्य समजून घेण्यासाठी माणसाला साक्षर असणे आवश्यक आहे, इमानदार असणे गरजेचे आहे, असा टोला त्यांनी शिंदेंच्या शिलेदारांना लगावला. शिंदे सेनेने कामाख्याला जाऊन अघोरी विधी केलेत की नाही, याच्यावर कोणीच उत्तर देत नसल्याचे ते म्हणाले. अघोरी विद्या ही अंधश्रद्धा कायद्याच्या विरोधात असताना सुद्धा असे काम झाले असेल तर ते राज्याच्या पुरागोमी विचारधारेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. लोकांनी सॉक्रेटिस, महात्मा फुले यांच्यासह महापुरूषांनाही वेगळी भूमिका मांडली म्हणून वेडे ठरवले. तसे मलाही ठरवत आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन राज्य कारभार करावा ही जनतेची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. जर ही एक नागरीक म्हणून आमची चिंता असेल तर शिरसाट यांना डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज नाही असा चिमटा त्यांनी काढला.
देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धेविरोधात कृती करावी
राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे. त्याविषयी काम करणारे अनेक जण आहेत. अनेक संघटना आहेत. वर्षा बंगल्यावर अंधश्रद्धेतून रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा होत आहे, ही मोठी गंभीर बाब आहे. त्याविषयीची चर्चा झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच सांगितले की ते मुलीची दहावीची परीक्षा झाली की वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे. त्यांनी खरंच तिथे राहायला जायला हवे, असे आवाहन राऊतांनी केले.