महाराष्ट्रातील महिला बालकल्याण विभागाचे काम उत्कृष्ट : स्मृती इराणी
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या काम उल्लेखनीय असल्याचे म्हणत कौतुक केले. तसेच कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही राज्याचे उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या.

मुंबई : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या काम उल्लेखनीय असल्याचे म्हणत कौतुक केले. तसेच कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही राज्याचे उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेत महिला व बालकल्याण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इराणी यांना राज्यातील कामाची माहिती दिली. राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागात केंद्रांच्या योजनांसोबतच महिला व बालकल्याणातील कुपोषणमुक्ती आणि आरोग्याशी संबंधित योजना आणखी सक्षमपणे राबवू असेही आश्वासन फडणवीस यांनी इराणी यांना दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कुपोषण मुक्ती आणि महिला आरोग्याच्या क्षेत्रात राज्यातील यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. यामुळे कुपोषणमुक्तीसह बाल मृत्यदर कमी करण्यात यश आले आहे. केंद्राप्रमाणेच राज्याच्या यंत्रणेनेही नागरी भागात विशेषत्वाने काम करण्याची गरज आहे. नागरी भागात या योजना आणखी सक्षम राबवल्यास आणखी प्रभावी कामगिरी करता येईल.’
केंद्रीयमंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, “महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. राज्यात कुपोषण मुक्ती, माता व बाल आरोग्य यात उत्कृष्टपणे काम सुरू आहे. ‘माँ’ या पोषण अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील, असा विश्वास वाटतो.’
यावेळी स्मार्ट अंगणवाडी, माता-बाल लसीकरण, पोक्सो अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया व कार्यवाही, बाल मृत्युदर रोखण्यासाठीच्या विविध उपाय योजना, जाणीव-जागृतीचे उपक्रम, प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी आधाराश्रमांची उभारणी आदी विषयांवर चर्चा झाली.
याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे केंद्रीय सचिव पवनार, प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त इंद्रा मालो, अजय खेरा आदी उपस्थित होते.