गुलामीच्या शेवटच्या काळात हेडगेवार, गोळवलकर गुरुजींनी दिली देशाला ऊर्जा; पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन

| Updated on: Mar 30, 2025 | 1:12 PM

प्रयागमध्ये नेत्रकुंभात स्वयंसेवकांनी लाखो लोकांची मदत केली. म्हणजे जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक आहे. आपत्ती आली, पूर आला, भूकंप आला स्वयंसेवक एक शिपायासारखा तिथे पोहोचतो. तो आपली पीडा पाहत नाही. फक्त सेवा भावनेने आपण कामात जोडतो. आपल्या हृदयातच सेवा हे अग्निकुंड आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

गुलामीच्या शेवटच्या काळात हेडगेवार, गोळवलकर गुरुजींनी दिली देशाला ऊर्जा; पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या 100 वर्षात संघाने सेवेलाच सर्वाधिक प्राधान्य दिलं. देशाच्या स्वातंत्र्याच्या काळापासून संघ सेवेत कार्यरत आहे. गुलामीच्या शेवटच्या काळात तर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजींनी देशाला ऊर्जा देण्याचं काम केलं आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे माधव नेत्रालय सेंटरच्या विस्ताराचा शिलान्यास करण्यात आला. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच संघ स्वयंसेवकांच्या सेवावृत्तीचाही गौरव केला. गुलामीच्या अखेरच्या काळात हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं. आज आपण पाहतोय, राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज 100 वर्षापूर्वी पेरलं. ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे. कोट्यवधी स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या आहेत. हा साधारण वटवृक्ष नाही. संघ भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षय वट आहे. हा अक्षय वट आज भारताच्या संस्कृतीला आपल्या राष्ट्राच्या चेतनेला निरंतर ऊर्जावान बनवत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

राष्ट्रीय चेतना विझू दिली नाही

आपल्या संतांनी भक्तीच्या विचारांनी आपली राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा दिली. गुरुनानक, कबीर, तुलसीदास, सुरदास, तुकाराम, एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी आपल्या राष्ट्रीय चेतनेला मौलिक विचारांनी प्राण ओतले. या आंदोलनाने भेदभावाचे जाळे तोडले. समाजाला एकतेच्या सूत्रात जोडले. स्वामी विवेकानंदांनी निराशात असलेल्या समाजाला जागं केलं. त्यांना त्यांच्या स्वरुपाची आठवण करून दिली. त्यांच्यातील आत्मसन्मान जागवलं. त्यांनी राष्ट्रीय चेतना विझू दिली नाही, असं मोदी यांनी सांगितलं.

स्वयंसेवकांचं कार्य नि:स्वार्थी

कोणतंही कार्यक्षेत्र असेल सीमावर्ती गाव असेल डोंगराळ भाग असेल, वनक्षेत्र असेल संघाचे स्वयंसेवक नि:स्वार्थी भावनेने काम करत असतात. कोणी वनवासी क्षेत्रात काम करत आहे. कोणी आदिवासी मुलांना शिकवत आहे. कोणी वंचितांची सेवा करत आहे. तर कोणी शिक्षणाचं काम करत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

संघ संस्कार यज्ञ

यावेळी मोदी यांनी विदर्भातील संत गुलाबराव महाराज यांचंही स्मरण केलं. विदर्भातील महान संत गुलाबराव महाराज यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. तरीही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. दिसत नसतानाही त्यांनी एवढी पुस्तकं कशी लिहिली? असा सवाल तुमच्या मनात आला असेल. संत गुलाबराव महाराजांकडे नेत्र नव्हते. पण दृष्टी होती. ही दृष्टी बोधातून येते. विवेकातून प्रकट होते. ही दृष्टी व्यक्तीसोबत समाजाला शक्ती देते. आपला संघही असा संस्कार यज्ञ आहे. जो अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टीसाठी आपण माधव नेत्रालयला पाहतो. आणि अंतरदृष्टीने संघाला सेवेचा पर्याय दिला आहे, असं मोदी म्हणाले.