42 दिवस.. तिचं शव मीठात! पोर गेली, बाप झगडतोय, गावकरी एकवटले
तिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देईपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाहीत, असा पवित्राही गावकऱ्यांनी घेतलाय.

पोरीचा घात केलाय. तिच्यावर बलात्कार (Rape) झालाय. कुणीतरी याचा तपास करा, माझ्या लेकीला न्याय द्या… 42 दिवस झाले एक बाप ओरडून ओरडून सांगतोय. गावकरी सांगतायत. आमच्याकडे पक्के पुरावे आहेत. तिच्या निष्प्राण शरीराची तपासणी करा. पोस्ट मॉर्टेम करा. नराधमांनी तिच्यासोबत काय केलंय, हे सांगायला आता ती नाही. पण तिचा गतप्राण देह बोलेल. पोस्टमॉर्टेम (Postmortem) केल्यानंतर सगळं उघड होईल… या आशेनं गावकऱ्यांनी तिचा मृतदेह मीठात पुरून ठेवलाय. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातली ही घटना. बापाचा लढा दीड महिन्यांपासून सुरु आहे. पण व्यवस्थेला ऐकू जाईल तर नं….
काय आहे प्रकरण?
नंदूरबार जिल्ह्यातल्या धाडगाव तालुक्यातली खडक्या गावातील ही घटना. मुलीच्या मृत्यूला 42 दिवस उलटले. अंत्यसंस्कार न करता गावकऱ्यांनी तिचा मृतदेह मीठात पुरून ठेवलाय.
मुलीवर बलात्कार होऊनही पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवलाय. एवढंच नाही तर पोस्टमॉर्टेम करतानाही बलात्काराच्या अनुषंगानं तिची तपासणी केली नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
नराधमांनी लेकीला संपवलंय. पण बाप आणि कुटुंबीय गावकऱ्यांच्या मदतीनं लढा देतायत. खडक्या गावातले रहिवासी आंतरसिंग काल्या वळवी हा संघर्ष करणारा बाप. त्यांच्या विवाहित मुलीला रंजीला हिला न्याय मिळवून देण्यासाठी झगडतोय.
तालुक्यातील वावी इथल्या रणजीत ठाकरे आणि अन्य एकाने तिला 1 ऑगस्ट 2022 रोजी जबरदस्तीनं गावाबाहेर नेल्याचा आरोप गावकरी करतायत. तिने एका नातलगाला फोन करून सांगितलं. पिक्चरप्रमाणे माझ्यासोबत बलात्कार करत असल्याचं म्हटलं.
हे घटनास्थळही तिनं दाखवल्याचं म्हटलं. मला ते मारून टाकतील, असं ती सांगत होती. आता एकाकडेच नाही तर अख्ख्या गावाकडे हे रेकॉर्डिंग आहे…
फोनकॉल आला आणि…
फोनवर बोलणं झाल्यानंतर तिनं काही वेळातच एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन कुटुंबियांना आला. वावीमध्येच हे घडलं. आरोपींनीच हे फोन केल्याचं म्हटलं जातंय.
ही बातमी कळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. पण लोकांच्या मदतीनं तिचा मृतदेह उतरवून घेत पुरावे नष्ट केले, असा आरोप गावकरी करत आहेत.
विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचं पोलिसांना सांगूनही पोस्ट मॉर्टेममध्ये तशा प्रकारची तपासणी झाली नाही. तिला फाशी दिली गेली असून पोलिसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे गावकरी म्हणतायत.
सध्या संशयित म्हणून पोलिसांनी या प्रकरणी रणजीत ठाकरेसह तिघांना अटक केली आहे. मात्र मुलीच्या शवाची योग्य तपासणी होऊन हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचं गावकऱ्यांनी ठरवलंय.
तिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देईपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाहीत, असा पवित्राही गावकऱ्यांनी घेतलाय.
खडक्या गावातले लोक वळवी कुटुंबीयांसोबत भक्कमपणे उभे आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं मुख्यमंत्र्यांच्या कानावरही ही गोष्ट टाकण्यात आली आहे.
वळवी कुटुंबाच्या बाजूनं अनेकजण उभे ठाकलेत. त्यामुळे आता पोलिसही नरमलेत. पुन्हा पोस्टमॉर्टेम केलं जाणार आहे.
पण रंजीलाच्या आवाजातला फोन कॉलचा रेकॉर्ड असतानाही त्या आधारे पोलिसांनी हत्येच्या दिशेनं तपास का केला नाही, पाणी नेमकं कुठे मुरतंय, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.