विधानसभा निवडणुकीआधी मोठी बातमी, ‘या’ 5 साखर कारखान्यांना कोट्यवधींचा थकहमी मंजूर, पण 2 नेत्यांना धक्का

| Updated on: Jul 24, 2024 | 10:13 PM

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील एकूण 13 सहकारी साखर कारखान्याचे थकहमी अर्थात मार्जिन लोनचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीने राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसी मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र यातील 2 सहकारी साखर कारखान्यांच्या प्रस्तावात कागदोपत्री त्रुटी काढून सदरील साखर कारखान्याचे प्रस्ताव रद्द केले आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीआधी मोठी बातमी, या 5 साखर कारखान्यांना कोट्यवधींचा थकहमी मंजूर, पण 2 नेत्यांना धक्का
'या' साखर कारखान्यांना कोट्यवधींचा थकहमी मंजूर
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने एकूण 16 सहकारी साखर कारखान्यांना थकहमी अर्थात मार्जिन लोन मंजुरीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. यातील 11 सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले आहेत. मात्र त्यातील कर्जाच्या आकडेवारीमध्ये काही थोडीफार नव्याने बदल केलेला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसीकडून थकहमीसाठी मंजुरी झाली आहे. यातील ज्या 2 कारखान्यांची थकहमी मंजूर झालेली नाही त्याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते संग्राम थोपटे आणि भाजप नेते विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांच्या लोनचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नव्याने थकहमी दिलेल्या राज्यातील 5 सहकारी साखर कारखान्यांची नावे

  • १) विठ्ठल सहकारी साखर कारखाना : लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असून सुद्धा ऐनवेळी भाजपाला पाठिंबा दिलेले अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी रुपयाची थकहमी देऊन जाहीर सभेत दिलेला शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अभिजीत पाटील यांची राजकीय भूमिका कशा पद्धतीची असणार? हे सुद्धा फार महत्त्वाचे ठरणार आहे
  • २) भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याला 22 कोटी रुपये थकहमी मंजूर झाला आहे.
  • ३) अशोक सहकारी साखर कारखाना श्रीरामपूर अहमदनगर 90 कोटी हे अजित पवार समर्थक यांचा सहकारी साखर कारखाना आहे.
  • ४) सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एसपी गटाचे जयंत पाटील समर्थक आमदार मानसिंग नाईक यांच्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याला 65 कोटी रुपयांची थकहमी देण्यात आलेली आहे. आमदार मानसिंग नाईक यांनी विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांना मतदान करून मदत केली असल्याची माहिती समोर येत आहे.
  • ५) नागनाथ अण्णा नाईकवाडे यांच्या सांगलीच्या क्रांतिवीर सहकारी साखर कारखाना याला 148 कोटी रुपयांची थकमी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार धैर्यशील माने यांना लोकसभा निवडणुकीत नागनाथ अण्णा नाईकवाडे यांनी राजकीय मदत केल्यामुळे ही आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 16 सहकारी साखर कारखान्यांना 2265 कोटी रुपयाचा थकहमीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजूर करून राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसीकडे पाठविला आहे.

‘या’ दोन कारखान्यांचे थकहमीचा प्रस्ताव रद्द

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील एकूण 13 सहकारी साखर कारखान्याचे थकहमी अर्थात मार्जिन लोनचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीने राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसी मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र यातील 2 सहकारी साखर कारखान्यांच्या प्रस्तावात कागदोपत्री त्रुटी काढून सदरील साखर कारखान्याचे प्रस्ताव रद्द केले आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत,काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी बारामती लोकसभेमध्ये अजित पवार यांना शब्द देऊन सुद्धा अपेक्षित मदत न केल्यामुळे त्यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा 80 कोटी रुपयाचा मार्जिन लोन थकहमीचा प्रस्ताव रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे.

याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघाचे भाजपाचे तरुण नेते विवेक कोल्हे यांच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा 125 कोटी रुपयांचा मार्जिन लोन थक हमी प्रस्ताव रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील विरुद्ध कोल्हे कुटुंबाचा राजकीयवाद सर्वश्रूत आहे. विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे यांना निवडणुकीत मदत झाली नाही याचबरोबर काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत सुद्धा,विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघमधून अपक्ष निवडणूक लढवली होती या सर्व पक्षाच्या विरोधात घेतलेल्या धोरणामुळे त्यांचा सुद्धा प्रस्ताव रद्द करण्यात आलेला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपाचे नेते विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘या’ साखर कारखान्यांना थकहमी मंजूर