आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने एकूण 16 सहकारी साखर कारखान्यांना थकहमी अर्थात मार्जिन लोन मंजुरीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. यातील 11 सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले आहेत. मात्र त्यातील कर्जाच्या आकडेवारीमध्ये काही थोडीफार नव्याने बदल केलेला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसीकडून थकहमीसाठी मंजुरी झाली आहे. यातील ज्या 2 कारखान्यांची थकहमी मंजूर झालेली नाही त्याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते संग्राम थोपटे आणि भाजप नेते विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांच्या लोनचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील एकूण 13 सहकारी साखर कारखान्याचे थकहमी अर्थात मार्जिन लोनचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीने राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसी मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र यातील 2 सहकारी साखर कारखान्यांच्या प्रस्तावात कागदोपत्री त्रुटी काढून सदरील साखर कारखान्याचे प्रस्ताव रद्द केले आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत,काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी बारामती लोकसभेमध्ये अजित पवार यांना शब्द देऊन सुद्धा अपेक्षित मदत न केल्यामुळे त्यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा 80 कोटी रुपयाचा मार्जिन लोन थकहमीचा प्रस्ताव रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे.
याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघाचे भाजपाचे तरुण नेते विवेक कोल्हे यांच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा 125 कोटी रुपयांचा मार्जिन लोन थक हमी प्रस्ताव रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील विरुद्ध कोल्हे कुटुंबाचा राजकीयवाद सर्वश्रूत आहे. विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे यांना निवडणुकीत मदत झाली नाही याचबरोबर काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत सुद्धा,विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघमधून अपक्ष निवडणूक लढवली होती या सर्व पक्षाच्या विरोधात घेतलेल्या धोरणामुळे त्यांचा सुद्धा प्रस्ताव रद्द करण्यात आलेला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपाचे नेते विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.