धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला अपघात, कार-ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक
धनंजय मुंडेंच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्या भीषण धडक झाली. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटे हा अपघात झाला आहे
Dhananjay Munde Wife Car Accident : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्या भीषण धडक झाली. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटे ही घटना घडली.
कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून दिली धडक
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ठिकाणी राजश्री मुंडे यांच्या कार आणि ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक झाली. यात राजश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली.
अधिक तपास सुरु
ही धडक इतकी जबरदस्त होती की धनंजय मुंडेंच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. तर बसच्या पाठीमागील भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात सध्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या याबाबत अधिक तपास सुरु आहे.
राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत
धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या बीडहून मुंबईकडे जात होत्या. त्याचवेळी सोरतावाडी या ठिकाणी एका खासगी ट्रॅव्हल्सला त्यांच्या कारने मागून धडक दिली. या अपघातात राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर राजश्री मुंडे या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
तब्बल १२ वर्षांनी पंकजा मुडे-धनंजय मुंडे हे एकत्र
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिना शिल्लक आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर होतील. सध्या धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंकजा मुडे यांच्यासोबत दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला होता. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल १२ वर्षांनी पंकजा मुडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आले होते.
आम्ही 12 वर्षानंतर एकत्र येतो हे वैशिष्ट्ये नाही. ही परंपरा आहे. आमच्यासाठी आम्हाला भगवानबाबा महत्त्वाचे आहेत. आम्ही कधी एकत्र मेळावा केला नाही. गोपीनाथ मुंडे असताना आम्ही खाली बसून भाषण ऐकायचो. पण आम्ही मेळाव्या निमित्ताने कधी एकत्र आलो नाही. आता आम्ही गेल्या काही वर्षापासून एकत्र एकाच मंचावर येऊन भाषणं देत आहोत. त्यामुळे मंचावर एकत्र येण्याची आम्हाला सवय लागली आहे, असे पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटले आहे.