जेव्हा संधी होती तेव्हा रस्त्यावर उतरले नाही, दीपक केसरकर यांची या मोठ्या नेत्यावर टीका
राज्य सक्षमपणे चालवावं लागतं. केवळ केंद्राकडे बोट दाखवून होत नाही.

अहमदनगर : शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जेव्हा संधी होती तेव्हा रस्त्यावर उतरले नाही. आता रस्त्यावर उतरत असल्याचं ते म्हणाले. शिवाय केवळ केंद्राकडं बोट दाखवून होत नाही. सत्ता हातात असताना ची चालवून दाखवावी लागते, असा टोलाही दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. पण, रस्त्यावर उतरण्याची जेव्हा संधी होती, तेव्हा उतरले नाही. सत्ता होती तोपर्यंत मास्क होता. सत्ता गेली लगेच मास्क उतरला. योग्य वेळी योग्य काम केलं नाही, तर चांगल्या माणसाबद्दल चुकीचा मॅसेज जातो. ठाकरे सरकार असताना महाराष्ट्र ठप्प झाला होता.
आता सत्ता बदलताचं सगळे सण लोकं उत्साहानं साजरे करतात. एखादी अडचण आली तर त्यावर उपाय केला जातो. घरी कोणीच बसलेलं नाही. प्रत्येकाचे व्यवहार सुरू आहेत. कोरोना काळातील देणी आम्ही फेड केली आहे.
राज्य सक्षमपणे चालवावं लागतं. केवळ केंद्राकडे बोट दाखवून होत नाही. आश्वासनांची पूर्तता आम्ही केलेली आहे. जे वेळेवर कर्ज भरत होते, त्यांना कर्जमाफी दिली. एकावेळी पाच लाख लोकांच्या अकाउंटला पैसे दिले, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
जी प्रक्रिया दोन-तीन वर्षे चालायची ती एक क्लीकवर आम्ही करत आहोत. अनेक नवीन टेक्नालॉजी आणतोय. समुद्धी महामार्गामुळं पाच तासात नागपूरला आलो. हा चमत्कार महाराष्ट्रात घडतोय. उद्या कोकणला जाण्यासाठीही असाच रस्ता बनणार आहे. त्यासाठी तुमचं राज्य येऊन चालत नाही.
महाराष्ट्राच्या जनतेनं राज्य आणलंय. आम्हाला सुबुद्धी दिली आहे. महाराष्ट्राच्या हिताची काम करायची आहेत. त्यासाठीची शक्ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाला असल्याचंही त्यांनी म्हंटलं.