
सांगली / शंकर देवकुळे : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. विवाहानंतर प्रत्येकाच्या नवीन आयुष्याला सुरवात होते. नव्या संसाराची नवी स्वप्ने डोळ्यात असतात. अशीच स्वप्ने डोळ्यात घेऊन नवविवाहित ढमणगे जोडपे देवदर्शनाला गेले होते. मात्र डोळ्यातली स्वप्न पूर्ण होण्याआधीच जोडप्याचा अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली. कर्नाटक राज्यातून देवदर्शन घेऊन परतत असतानाच नवदाम्पत्याचा कार अपघातात करुण अंत झाला. कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर ट्रक आणि कार अपघात घडला. यात नवविवाहित जोडपे ठार झाले, तर आई-वडिल जखमी झाले आहेत. जखमी आई-वडिलांवर इस्लामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इस्लामपूर येथील रहिवासी असलेल्या ढमणगे कुटुंबातील इंद्रजित ढमणगे या तरुणाचा 18 मार्च रोजी कल्याणी हिच्याशी विवाह झाला. इंद्रजित हा मुंबईत टीसीएस कंपनीत नोकरी करत होता. विवाहानंतर दोघे जण आई-वडिलांसह कर्नाटक राज्यातील शाकंभरी देवीच्या दर्शनाला गेले होते. देवीचे दर्शन घेऊन शनिवारी सर्व कुटुंबीय आपल्या कारने घरी परतत होते.
देवदर्शनाहून परतत असताना कारला अपघात
परतीच्या प्रवासात असतानाच मुडलंगी जवळीस हलूर येथे समोरुन येणाऱ्या ट्रकला त्यांच्या कारने धडक दिली. या धडकेत इंद्रजित आणि कल्याणीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इंद्रजितचे आई-वडिल मोहन ढमणगे आणि मिनाक्षी ढमणगे हे दोघेही गंभीर जखमी असून, त्यांच्यावर इस्लामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत नवविवाहित जोडप्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.