दक्षिण मुंबईतील गजबजलेला भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळींचा लवकरच कायापालट होणार आहे. 10 बाय 10 च्या खोल्या असलेल्या वरळीकरांना लवकरच आलिशान फ्लॅट मिळणार आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारतींचं बांधकाम होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडलाय.
वरळी येथे सर्वाधिक म्हणजे 121 चाळी असून, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + 40 मजल्यांच्या 33 पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहेत.
रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झालेय. प्रत्येक सदनिकांमध्ये 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहे.
पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटांच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून 500 चौरस फुटांची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे.
खिडक्यांसाठी पावडर कोटिंगचे अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक इमारतीमध्ये 3 पॅसेंजर लिफ्ट, 1 स्ट्रेचर लिफ्ट व 1 फायर लिफ्टची सुविधा असणार आहे.
पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरण पूरक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ + 6 मजली पोडियम पार्किंग व 2 प्रशस्त जिने असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व पुनर्वसन इमारती भूकंप रोधक असणार आहेत.