राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे… पंतप्रधान मोदींचे नागपुरात गौरवोद्गार
गुलामगिरीच्या काळात डॉ. हेडगेवार यांनी नवीन विचार दिला. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला. जिथे सेवा आहे, तिथे स्वयंसेवक आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी गौरवोद्गार काढले. स्वयंसेवकांना सेवा, संस्कार आणि साधना या मूल्यांमुळेच प्रेरणा मिळते, असेही मोदींनी म्हटले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवासाबद्दल आणि १०० वर्षाचाही उल्लेख केला. नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या रूपात एका तीर्थक्षेत्राची स्थापना होत आहे. माधव नेत्रालयाने अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली आहे. आता नवीन परिसरामुळे या सेवाकार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
स्वामी विवेकानंदांनी निराशात असलेल्या समाजाला जागं केलं
आपल्या संतांनी भक्तीच्या विचारांनी आपली राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा दिली. गुरुनानक, कबीर, तुलसीदास, सूरदास, तुकाराम, एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी आपल्या राष्ट्रीय चेतनेला मौलिक विचारांनी प्राण ओतले. या आंदोलनाने भेदभावाचे जाळे तोडले. समाजाला एकतेच्या सूत्रात जोडले. स्वामी विवेकानंदांनी निराशात असलेल्या समाजाला जागं केलं. त्यांना त्यांच्या स्वरुपाची आठवण करून दिली. त्यांच्यातील आत्मसन्मान जागवलं. त्यांनी राष्ट्रीय चेतना विझू दिली नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
कोट्यवधी स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या
गुलामीच्या अखेरच्या काळात हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी त्याला नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं. आज आपण पाहतोय, राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज १०० वर्षापूर्वी पेरलं. ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे. कोट्यवधी स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या आहेत. हे साधारण वटवृक्ष नाही. संघ भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षय वट आहे. हा अक्षय वट आज भारताच्या संस्कृतीला आपल्या राष्ट्राच्या चेतनेला निरंतर ऊर्जावान बनवत आहे, असे मोदींनी म्हटले.
देशाला मिटवण्याचे क्रूर प्रयत्न
माधव नेत्रालय आरोग्य क्षेत्रात याच प्रयत्नांना पुढे नेत आहे. गरीब आणि वयोवृद्ध लोकांना उपचारांची चिंता सतावू नये, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे कोट्यावधी लोकांना मोफत आरोग्य सुविधा मिळेल. आज भारताचा सन्मान जगात वाढत आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत अनेक आक्रमणे झाले. देशाला मिटवण्याचे क्रूर प्रयत्न झाले. पण आपली ज्योत सतत तेवत राहिली. यासाठी वेळोवेळी आंदोलने झाली आणि त्यापैकीच भक्ती आंदोलन एक महत्त्वाचे उदाहरण आहे. आपल्या संतांनी राष्ट्रीय चेतनेला नवी ऊर्जा दिली. स्वामी विवेकानंदांनी निराश झालेल्या समाजाला जागे करून आशेचा संचार केला. गुलामगिरीच्या काळात डॉ. हेडगेवार यांनी नवीन विचार दिला. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक संस्कार आहे, जो अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टी दोन्हीसाठी कार्य करत आहे. बाह्य दृष्टीने माधव नेत्रालयाचा जन्म झाला, तर अंतर्दृष्टीने संघाला सेवेचा पर्याय बनवले आहे. ही सेवा, संस्कार आणि साधना पिढ्यानपिढ्या प्रत्येक स्वयंसेवकाला प्रेरणा देत आहे. त्याला गतिमान ठेवते आणि कधीही थकू देत नाही”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.