देशाच्या विकासाची त्रिवेणी काय? पंतप्रधान मोदींनी सांगितलं विकासाचं सूत्र
पंतप्रधान मोदींनी नागपुरातल्या भाषणात भारताच्या विकासाचे सूत्र मांडले. त्यांच्या मते, संघटन, समर्पण आणि सेवा या तिन्ही घटकांचे एकत्रित योगदान देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी स्वयंसेवकांच्या निस्वार्थी सेवेचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचं सूत्र काय याबद्दलची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी केली. यानंतर त्यांनी जोरदार भाषण केले. कोणतंही कार्यक्षेत्र असेल सीमावर्ती गाव असेल डोंगराळ भाग असेल, वनक्षेत्र असेल संघाचे स्वयंसेवक निस्वार्थी भावनेने काम करत असतात. कोणी वनवासी क्षेत्रात काम करत आहे. कोणी आदिवासी मुलांना शिकवत आहे. कोणी वंचितांची सेवा करत आहे. तर कोणी शिक्षणाचं काम करत आहे. प्रयागमध्ये नेत्रकुंभात स्वयंसेवकांनी लाखो लोकांची मदत केली. म्हणजे जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक आहे. आपत्ती आली, पूर आला, भूकंप आला स्वयंसेवक एक शिपायासारखा तिथे पोहोचतो. तो आपली पीडा पाहत नाही. फक्त सेवा भावनेने आपण कामात जोडतो. आपल्या हृदयातच सेवा हे अग्निकुंड आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताने मदत करण्यास मागे पुढे पाहिले नाही
म्यानमारमध्ये काल भूकंप आला. भारत ऑपरेशन ब्रह्माच्या अंतर्गत तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी सर्वात आधी गेला. तुर्की, नेपाळमध्ये भूकंप आला. मालदिवमध्ये पूर आला. भारताने मदत करण्यास मागे पुढे पाहिले नाही. युद्धाच्या परिस्थिती आपण आपल्या नागरिकांना दुसऱ्या देशातून सुरक्षित आणतो. भारत प्रगती करत आहे. तर ग्लोबल साऊथचा आवाज होत आहे. विश्वबंधूची भावना आपल्याच संस्काराचा विस्तार आहे, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले.
देशाच्या विकासाची त्रिवेणी
“आपले युवा हेच आपली पूंजी आहे. भारतातील तरुण आत्मविश्वासाने भरलेला आहे. त्याची रिस्क टेकिंग कॅपेसिटी आधीपेक्षा अधिक आहे. तो नवीन इनोव्हेशन करत आहे. स्टार्टअपच्या दुनियेत झेंडा फडकवत आहे. आजचा युवा आपल्या संस्कृतीवर अभिमान बाळगत मार्गक्रमण करत आहे. आजची युवा पिढी लाखोच्या संख्येने महाकुंभात आली. या सनातन परंपरेला जोडली गेली. आज भारताचा युवा देशाच्या गरजांना समोर ठेवून काम करत आहे. भारताच्या युवांनी मेक इंडिया यशस्वी केलं आहे. आपल्याला देशासाठी जगायचं आहे. देशासाठी काही करायचं आहे. खेळाच्या मैदानापासून अंतराळापासून आपल्या तरुणांमध्ये राष्ट्र निर्माणाची भावना वाढली आहे. हाच युवा २०४७ मध्ये स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील. ते विकसित भारताचा ध्वज घेऊन जातील. मला विश्वास आहे की, संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी विकसित भारताच्या प्रवासाला ऊर्जा देईल. विश्वास देईल. संघाचा एवढ्या वर्षाचा परीश्रम फळाला येत आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.