सरपंच संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम अहवालातून अनेक धक्कादाय खुलासे, कौर्याची परिसीमा, शेवटच्या दीड तासात नेमकं काय घडलं?
संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे, त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून सातत्यानं पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. दरम्यान आता संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम अहवाल समोर आला आहे, या पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोस्टमार्टम अहवालात नेमकं काय म्हटलं?
संतोष देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. संतोष देशमुखांची छाती, डोकं, हात-पाय चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहरा आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा -निळा पडला होता. संतोष देशमुखांचा मृत्यू ‘हॅमरेज टू मल्टिपल इन्जुरिज’मुळे झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे. संतोष देशमुखांना जबर मारहाण केल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. जबर मारहाण केल्यामुळे संतोष देशमुख यांच्या शरीरातून अति रक्तस्त्राव झाला, त्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे.
पोस्टमार्टम अहवालानुसार संतोष देशमुख यांच्या अंगावर एकूण 56 जखमा आहेत. डोळ्यांना मारहाण करण्यात आली, मात्र जाळण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं समोर आलं आहे. पाठीवर सर्वाधिक मुका मार देण्यात आला आहे. त्यांना लोखंडाच्या पाईपनं मारहाण करण्यात आली आहे. मात्र अंगावर कुठेही फॅक्चर नाहीये, संतोष देशमुख यांना किमान दीड तास मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतक्या क्रूरपणे करण्यात आली आहे, की तिच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या पाठीवर हातावर आणि पायावर मारहाणीचे व्रण पाहायला मिळत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं होतं, ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचं अपहण केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.