आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे; राधाकृष्ण विखे-पाटलांचं भाकीत
राज्यातील आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार असून फक्त वेळेचा प्रश्न आहे, असं भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. (radhakrishna vikhe patil)

पुणे: राज्यातील आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार असून फक्त वेळेचा प्रश्न आहे, असं भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकार पडण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Maharashtra govt will fall due to its own burden: radhakrishna vikhe patil)
पुण्यात मीडियाशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे भाकीत केलं. राज्यातील आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत आहे. त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही, असं सांगतानाच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत भाजप निर्णय घेईल, असं विखे-पाटील यांनी स्पष्ट केलं.
पुनर्विचार याचिका दाखल करणार
यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नाही. हे सरकार काही करेल असं वाटत नाही. त्यामुळे आता मीच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्याची तयारीही सुरू केली आहे, असं त्यांना सांगितलं. सरकारच्या अनास्थेमुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षणाचंही तेच झालं. त्यामुळे सरकार विरोधात वातावरण आहे. सरकारला हेच करायचं होतं का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
ती तर फॅशन झालीय
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर सरकारने प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होते. त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती. मात्र, ते न करता सर्व काही केंद्र सरकारवर ढकलंत आहे. काहीही झालं की केंद्र सरकारवर ढकलायचं ही आता फॅशन झाली आहे. त्यामुळेच मी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.
मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांची फी भरणार
सारथीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा द्या, मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांची 100 टक्के फी सरकारने भरावी, इतर शिक्षण संस्थाचालकांनीही त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असं सांगतानाच माझ्या मतदारसंघातील जे विद्यार्थी प्रवरा शिक्षण संस्थेत अॅडमिशन घेतील त्या मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांची फी मी स्वत: भरणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यांनी अशा प्रकारचा शिक्षणाचा भार उचलावा, असं आवाहनही त्यांनी केलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदवला. सरकारमधील लोकांकडे संयम असायला हवा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर होणाऱ्या कारवाईचं त्यांनी समर्थनच केलं. (Maharashtra govt will fall due to its own burden: radhakrishna vikhe patil)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100https://t.co/oRvJV3DWBX#News | #NewsAlert
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 30, 2021
संबंधित बातम्या:
इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू; नाना पटोलेंची खोचक टीका
(Maharashtra govt will fall due to its own burden: radhakrishna vikhe patil)