संतोष देशमुखांचं कुटुंब जरांगे पाटलांच्या भेटीला, पत्नी अश्विनी देशमुख भावुक, म्हणाल्या दादांना…
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, संतोष देशमुख यांच्या आई, मुलगी आणि पत्नी यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
![संतोष देशमुखांचं कुटुंब जरांगे पाटलांच्या भेटीला, पत्नी अश्विनी देशमुख भावुक, म्हणाल्या दादांना... संतोष देशमुखांचं कुटुंब जरांगे पाटलांच्या भेटीला, पत्नी अश्विनी देशमुख भावुक, म्हणाल्या दादांना...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/manoj-jrange-patil.jpg?w=1280)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत. त्यासाठी ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी त्यांची भेट घेतली, संतोष देशमुख यांच्या आई, मुलगी आणि पत्नी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी बोलताना संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख चांगल्याच भावुक झाल्या.
नेमकं काय म्हणाल्या अश्विनी देशमुख?
मी दादासाठी आजच पहिल्यांदा घराच्या बाहेर पडले, दुःखाचा डोंगर कोसळल्यावर काय असतं हे जेव्हा कळलं तेव्हा मला दादाला पाहून वेदना होत आहेत. कुटुंबावर दु:ख कोसळलं की त्या कुटुंबाची काय अवस्था होते याची जाणीव मला आहे. मला वाटतं अशी कुणावरही वेळ येऊ नये, लवकरात लवकर फडणवीस साहेबांनी दादांना न्याय द्यावा. शासन तर तसंच म्हणतं चालू आहे व्यवस्थित, पण इतके दिवस झाले अजूनही न्याय मिळालेला नाहीये. इतका उशिर का लागतोय? लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, असं संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी म्हटलं आहे.
संतोष देशमुख यांच्या आईची प्रतिक्रिया
संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई यांनी देखील आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी पटकन आरक्षण द्यावं, मी जरांगे पाटलांना विनंती केली बसू नका, तुम्हीच बसले तर आम्हाला कोण आहे. मला न्याय पाहिजे, ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्या आरोपींना फाशी द्यावी. आम्हाला संरक्षण पाहिजे. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे, नाहीतर आमाची सुद्धा सहनशक्ती संपली आहे. वेळेला पण काही मर्यादा असते. राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांना पटकन फाशी द्यावी, म्हणजे माझ्या जीवाला समाधान वाटेल असं संतोष देशमुख यांच्या आईने म्हटलं आहे.
वैभवी देशमुख यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की, लवकरात लवकर आरक्षणाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. दादांची तब्येत खालावत आहे. आम्हाला त्यांच्याकडे बघावसं वाटत नाही. माझ्या वडिलांना सुद्धा न्याय द्यावा, देवाकडे एकच मागणी आहे की दादाला बळ द्यावं. सरकारला मी एवढेच सांगते की दादाला काय झालं तर तुम्ही सर्वजण जबाबदार असाल. जरांगे पाटील यांच्या घरच्यांना सुद्धा दुःख वाटतं, जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या घरच्यांना देखील भावना आहेत, त्यांना वाटतं की दादांनी हे सर्व बंद करावं, असं वैभवी देशमुख यांनी म्हटलं आहे.