Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना थेट बारामतीमधून आर्शिवाद, भर कार्यक्रमात आली ‘ती’ चिठ्ठी!

| Updated on: Jun 22, 2023 | 9:46 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचं उघडपणे विरोधी पक्षातील नेतेही बोलत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चालू सभेमध्ये बारामतीवरून आलेली चिठ्ठी चर्चेचा विषय ठरत आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना थेट बारामतीमधून आर्शिवाद, भर कार्यक्रमात आली ती चिठ्ठी!
Follow us on

मुंबई : राज्यातील राजकारणात सर्व पक्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फिल्डिंग लावताना दिसत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष सुरु असताना राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकारी पक्षध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचं उघडपणे विरोधी पक्षातील नेतेही बोलत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चालू सभेमध्ये बारामतीवरून आलेली चिठ्ठी चर्चेचा विषय ठरत आहे.

काय आहे नेमकं बारामतीच्या चिठ्ठीत?

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात पोलीस स्थानकाच्या भूमीपूजन सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस भाषण करण्यापूर्वी त्यांना पोलीस अधिक्षांनी एक चिठ्ठी दिली. त्या चिट्ठीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे आभार मानण्यात आले होते. वारकऱ्यांसाठी विमा योजना जाहीर केल्याबद्दल वारकऱ्यांच्या वतीने सरकारचे मानले होते. ह.भ.प.इंद्रसेन आठवले यांनी ही चिट्ठी लिहीली होती. तर या चिट्ठीचं वाचन करताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ही चिट्ठी बारामतीहून आली असल्याचं सांगितलं. त्यावेळी थेट बारामतीहून आर्शिवाद आला आहे असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आषाढी वारी उत्सवाच्या पार्श्वभूमीवरसर्व वारकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने विमा कवच देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारने वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना आणणार असल्याचीही घोषणा केली. या निर्णयाचे अनेक वारकऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं आहे.

पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज

आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यामुळे सरकारची काहीशी कोंडी झाली होती. विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. त्यानंतर वारकरी वर्गामध्ये सरकारविषयी काहीसा रोष निर्माण झाल्याची चर्चाही रंगू लागली. त्यानंतर सरकारने आता विमा सुरक्षा योजना जाहीर करत वारकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतला.