अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…; माजी मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण

| Updated on: Sep 11, 2024 | 8:53 AM

Baramati Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अजित पवार यांनी बारामतीत बोलताना एक विधान केलं. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भाष्य करण्यात आलं आहे. अजित पवार घाबरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर...

अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण...; माजी मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण
अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

पिकतं तिथं उगवत नाही. बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. 1991 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केलं. यावर आता शरद पवार गटाच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. जळगावमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार घाबरतायेत- पाटील

अजित पवार यांनी शरद पवार यांना रोखलं का? उलट बारामतीकरांनी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता अजित दादा स्वतः म्हणत आहेत की मी बारामतीमध्ये निवडणूक लढणार नाही. बारामतीमध्ये शरद पवार साहेबांची कामगिरी आहे. त्यामुळे अजित पवार हे स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवायला घाबरत आहेत. फुटून आलेल्या आमदार 2 हजार, 3 हजार कोटींची काम सांगतात. त्या सुद्धा त्यांनी की टक्केवारी घेतलेली आहे लोक त्यांना जाब विचारत आहेत. त्यामुळे लोक यांचा हिशोब करायला निघालेले आहेत, असं डॉ. सतीश पाटील यांनी म्हटलं आहे.

मविआ सरकार येणार- पाटील

अनेक योजना आणून सुद्धा लोक त्याला भुलत नाहीये त्यामुळे जास्तीत जास्त निवडणूक लांबवल्या जात आहेत. पर्याय म्हणून राष्ट्रपती राजवट लागण्याची सुद्धा शंका आम्हा सर्वांना वाटते आहे. सगळे घरी जाणार आहेत, आणि विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील. महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

एकनाथ खडसे या भाजपमध्ये जाण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून वेटिंगवर होते. पण भाजपकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही पाटील यांनी भाष्य केलं. एकनाथ खडसे यांना सुद्धा मान्य झाला आहे की महाविकास आघाडीचे सरकार येत आहेत. त्यामुळे ते जर म्हणत असतील की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. तर त्यांच्या तोंडात साखर पडू द्या. भाजपने त्यांना लटकवून ठेवलं आहे..मात्र त्यांनी दिलेला अल्टिमेटम हा संपलेला आहे, असं सतीश पाटील म्हणाले.