Sanjay Raut : ज्या दिवशी मोदी-शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ते छप्पर उडेल तेव्हा… संजय राऊतांचा शिंदेंना थेट इशारा
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांत टीका केली आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञता दाखवावी असे राऊत म्हणाले. त्यांनी शिंदेंच्या भाषेवर आणि मोदी-शहा यांच्या आधारावर अवलंबून राहण्यावरून चिंता व्यक्त केली. राऊतांनी शिंदेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञ असलं पाहिजे. तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झाले आहेत, तुम्ही आमच्यावर टीका करता, आम्ही तुमच्यावर करतो,पण ज्या प्रकारची भाषा ते ( शिंदे) उद्धव ठाकरेंबद्दल वापरता, त्यांनी स्वत:चं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या दिवशी मोदी-शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ते छप्पर उडेल तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा विचार शिंदे आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरांच्या गाभाऱ्यात बसून करायला हवा, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना थेट सुनावलं.
हा माणूस दगा देईल..
आज एकनाथ शिंदे हे स्वत:चं जे आर्थिक, सत्तेचं वजन दाखवत आहेत, त्याचं मूळ उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उर्जेमध्ये आहे ना. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उर्जा दिली नसती तर… ही अशी उर्जा त्यांना देऊ नका, हा माणूस घात करेल हे सांगणारे लोकं आज त्यांच्याच ( शिंदेच्या) अवतीभवती आहेत ठाण्यातले. ठाण्यात जे आमदार , खासदार आहेत ना आसपासचे, हे सगळे उद्धव ठाकरेंना ‘मस्के’ लावायला आले होते, असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला. साहेब हे करू नका, हा माणूस ( शिंदे) तुम्हाला दगा देईल, याची नियत चांगली नाही, हे सांगणारे लोकंच आज त्यांच्या भोवती आहेत. आम्ही त्याला साक्षीदार आहोत, असा दावा करत एकनाथ शिंदेंनी जपून पावलं टाकावी, असेही राऊत म्हणाले.
राज्यकर्त्यानं जर टीका सहन केली तर तो दोन पाऊल पुढं जातो , आणि विशेषत: ज्याने आपल्यावर सुरूवातीच्या काळापासून मेहेरबानी केली आहे, भरभरून दिलं आहे, त्याच्याबाबतीत जपून केलं पाहिजे. छगन भुजबळांनी ते पथ्य पाळलं होतं,गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो, त्यांनीही पक्ष सोडल्यावर शिवसेना आणि मा. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर काहीच टिप्पणी केली नाही, कारण ते कृतज्ञ होते.
नाहीतर मोदी-शहा, फडणवीसांनी दारातही उभं केलं नसतं..
त्यांनी ( ठाकरे कुटुंबाने) तुम्हाला दिलं म्हणून तुमची आज किंमत वाढली ना, नाहीतर मोदी-शहांनी आज तुम्हाला विचारलंही नसतं. मोदी, शहा आणि फडणवीस तुम्हाला दारात उभं करणार नाहीत, त्यांची नियत काय आहे हे मला माहीत आहे ना. शिवसेना फोडण्याची तुमची क्षमता होती म्हणून तुम्हाला जवळ केलं. तुमच्यात फार मोठी कर्तबगारी आहे किंवा तुम्ही महाराष्ट्रासाठी, देशासाठी फार मोठं सामाजिक कार्य केलं, म्हणून त्यांनी तुम्हाला ( शिंदे) आश्रय दिला नाही. तुम्ही त्यांच आश्रित आहात कारण पैशांच्या ताकदीवर तुम्ही शिवसेना फोडू शकलात म्हणूनच, अशी टीका राऊत यांनी केली.