संजय राऊत म्हणजे जग्गा जासूस; शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
शिंदे गटाच्या एका आमदाराने हल्लाबोल केला आहे. "संजय राऊतांना भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे अध्यक्ष बनवा", अशी खोचक टीका शिंदे गटाच्या आमदाराने केली आहे.

Bharat Gogawale on Sanjay Raut : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यावर तर नाहीत ना? असा गंभीर सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. आता यावर शिंदे गटाच्या एका आमदाराने हल्लाबोल केला आहे. “संजय राऊतांना भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे अध्यक्ष बनवा”, अशी खोचक टीका शिंदे गटाच्या आमदाराने केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नुकंतच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. “संजय राऊत हे जग्गा जासूस आहेत. त्यांना कोण कुठं लपलंय हे कळतं. त्यांना भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे अध्यक्ष बनवा”, अशा शब्दात भरत गोगावले यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.
“अशीच संजय राऊतांची अवस्था झालीय”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पारदर्शक आहेत. त्यांनी जो काही प्रकार घडला, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोघांनीही माफी मागितली, पण तरीही संजय राऊत यांचे तोंड बंद होऊ शकत नाही, त्यामागे एक कारण आहे. समजा जर एखादा माणूस पिणारा असेल तर त्याला प्यायाल्याशिवाय झोप लागत नाही, तशीच संजय राऊतांची अवस्था झाली आहे. त्यांना जर विरोधात काही बोललं नाही, तर त्यांना काही सुचत नाही, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही”, असेही भरत गोगावले म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आताच्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रेम नाही. कदाचित कार्यालयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा काढून अदानीचे फोटो, पुतळे लावतील ही अवस्था झाली आहे. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, प्रफुल्ल पटेल अशा अनेकांनी महाराजांचा अपमान केला. हे सगळे भाजपचे प्रॉडक्ट आहेत. अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपमध्ये आहे, यावरून भाजपचं शिवरायांवरचं प्रेम पाहा, असे संजय राऊत म्हणाले.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी फरार आहेत. मग ते आरोपी वर्षा बंगल्यावर तर नाहीत ना की ज्या टिलल्या पिल्ल्यांसोबत फोटो आहेत, त्यांनी लपवलेले नाही ना, अशी लोकांना शंका आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.