मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे हा पुतळा कोसळल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी अनावरण झालेला हा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरून शिवप्रेमी आणि विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. पुतळ्यावरून राज्यातील राजकारण तापलं असतानाच हे पुतळे नेमके कशासाठी, त्यांना इतकं महत्त्व का आहे आणि पुतळे उभारण्यासाठी कोणकोणते निकष पाळावे लागतात, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. पुतळे कशासाठी? भविष्याकडे वाटचाल करताना आपल्या भूतकाळाला म्हणजेच इतिहासाला विसरून चालत नाही. पुतळा हा इतिहास आणि संस्कृतीचं स्मरण म्हणून ओळखला जातो. पुतळे समाजात प्रतिकांचंच काम करतात. कोणाकडे सत्ता होती किंवा आहे, इतिहासात काय घडलं होतं हे पुतळ्यांच्या रुपात आपल्यापुढे येतं. आपण त्यांना महत्त्व देतो कारण त्यांच्यात आपण स्वत:ला आणि आपल्या इतिहासाकडे पाहतो. पुतळे हे ऐतिहासिक घटना आणि आकृत्यांचं मूर्त स्मरणपत्र म्हणून काम करतात. भविष्यातील पिढ्यांसाठी आपला...