तुम्ही माझ्यासारख्याला…. नाराजीच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना आपण कुठेही नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू नये यावर भर दिला.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच आता चंद्रपुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी फेसबुक पोस्ट केली. त्यावेळी त्यांनी चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे नाव घेणं टाळलं. त्यातच चंद्रपुरात केलेल्या भाषणावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीचे तख्त राखायचे असतील तर चंद्रपूरला सोबत घेऊन जावं लागेल, असे विधान केले. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाला. आता या चर्चेवर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाराजीच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले. “मी कुठेही नाराज नाही, माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकले नाहीत”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्हा उणे करु नका
“हे अर्धवट डोक्यातून निघालेलं इंटरप्रिटेशन आहे. भाषण काय होतं की विकासादरम्यान कुठेही या जिल्ह्याला पैसे कमी पडू नये. विकासाला पैसे देताना मी सांस्कृतिक मंत्री म्हणून नाट्यगृहाची मागणी या गावाने केली आहे. त्यासाठी पैसे कमी पडू देऊ नका. कारण मी राज्यगीत केलेलं आहे. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा…पण महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखत असताना चंद्रपूर जिल्हा उणे करु नका. चंद्रपूर जिल्ह्याला मायनस करु नका”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकलेले नाही
कशाचीही नाराजी नाही. कशासाठी नाराजी आहे. फक्त हेच जीवन आहे. आतातरी तुम्ही समजून घ्या की माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकलेले नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
सुधीर मुनगंटीवार भाषणावेळी काय म्हणाले?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार भाषण केले होते. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल अशा शब्दात सुधीर मुनंगटीवार यांनी भावना व्यक्त केली. सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला गेला होता. त्यात राज्याचे आशिष शेलार उपस्थित होते. त्यांच्या समोरच मुनगंटीवारांनी मनातील सल बोलून दाखवली, असे बोललं जात आहेत.