हिट अँड रनने ठाण्यात एकाचा बळी, 36 तासानंतरही कारवाई नाही; मनसेची डेडलाईन कुणाला?
ठाण्यात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात 21 वर्षीय दर्शन हेगडे या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून पोलिसांच्या बेजबाबदारीवर निषेध व्यक्त केला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Thane Hit And Run Case : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात हिट अँड रनच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. पुणे, मुंबई या पाठोपाठ आता ठाण्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. ठाण्यात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार हा खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली. मात्र त्याची मदत न करता तो कारचालक तेथून फरार झाला. या दुर्घटनेत 21 वर्षांच्या दर्शन शशिधर हेगडे तरूणाचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ठाण्यातील हिट अँड रन प्रकरणी आता मनसेने आक्रमक पावित्रा घेतला.
मनसे नेते अविनाश जाधव आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ लक्ष द्या. सध्या पब संस्कृतीची वाढली आहे. त्यामुळे त्याला आळा घालायला हवा, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा अपघात कसा झाला, याचीही माहिती दिली.
“याप्रकरणी तात्काळ लक्ष द्यायला हवं”
“ज्या वेळेला हा अपघात झाला, त्यावेळेस ती गाडी थांबली असती तर तो मुलगा जिवंत असता. तो मुलगा तडफडत पडला होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशा नराधमाची अजिबात सुटका व्हायला नको. या घटनेला 36 तास उलटून गेले आहे. मात्र अजून त्याचा शोध लागलेला नाही. याप्रकरणी गाडी सापडली आहे, असे पोलीस सांगत आहेत. पण पोलीस स्थानकात कुठलीही गाडी दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याकडे गंभीररित्या पाहायला हवे. तसेच याप्रकरणी तात्काळ लक्ष द्यायला हवं”, असे अविनाश जाधव म्हणाले.
“जर त्या मुलाच्या आईला न्याय मिळवून द्यायचा असेल, तर त्याला पकडायला हवं. ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस त्याने गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि फोन बंद करून गायब झाला आहे. तो क्रिमिनल माईंड असावा अशी माझी धारणा आहे. त्यामुळे अशा माणसाला बाहेर ठेवणं, हे धोकादायक आहे. त्याला ताबडतोब अटक करायला हवी”, अशी माझी मागणी आहे.
“पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न”
“जर आज संध्याकाळपर्यंत याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही, तर लोक आक्रमक होतील आणि यानंतर पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही नक्की करु. आमचा संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत असणार आहे”, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
“पोलिसांना थोडा वेळ द्यावा, असे मला वाटतं. मला अपेक्षित आहे की आज संध्याकाळपर्यंत याप्रकरणी काहीतरी कारवाई होईल. जर नाही झाली तर मग शेवटी लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. सध्या पब संस्कृतीची वाढली आहे, त्याला आळा घालायला हवा. पोलिसांनी जे नियम बनवले आहेत, ते नीट पाळले गेले तर पब संस्कृती देखील बंद होईल याची खात्री आहे”, असेही अविनाश जाधव यांनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान ठाण्यातील नितीन जंक्शन या ठिकाणी हिट अँड रनची घटना घडली आहे. यात 21 वर्षांच्या दर्शन शशिधर हेगडे या तरूणाचा मृत्यू झाल. तो ठाण्यातीलच वागळे इस्टेट परिसरातील संत ज्ञानेश्वर साईकृपा सदन चाळीत राहत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस अधिक तपास करत असून आरोपी कारचालकाचा कसून शोध घेत आहेत.
याप्रकरणी पीडित कुटुंबाने आम्हाला न्याय पाहिजे, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई व्हायला हवी. तसेच आम्हाला न्याय मिळायला हवा. पोलीस प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आरोपीला शोधून काढा आणि त्याला शिक्षा द्या, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे.