
ठाणे : खासगी नोकरी करताना काम जास्त करावं लागते. त्या तुलनेत मोबदला फारच कमी मिळतो. तीन-चार लाख रुपये वर्षाचे पॅकेज मिळते. त्यासाठी वरिष्ठांच्या नाहक गोष्टी ऐकाव्या लागतात. पैसे त्या मोबदल्यात मिळत नाही. त्यामुळे काही तरुण शेतीकडे वळत आहेत. सेंद्रीय शेती करून चांगले उत्पन्न कमवत आहेत. अशीच एक प्रेरणादायी ही कहाणी. या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीची कास धरली. दोन एकर जागेत भाजीपाला लागवड केली. त्यातून तीन महिन्यात त्याला सहा लाख रुपयांचा नफा झाला. आणखी काही रक्कम त्याला मिळणार आहे.
शहापूर तालुक्यातील चरीव येथील युवा शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. या शेतीमध्ये युवा शेतकऱ्याने अत्याधुनिक पद्धतीची कास धरली. नवीननवीन प्रयोग करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले.
चरीव गावच्या गजानन उमवणे या शेतकऱ्याने दोन एकर शेतीमध्ये सूर्यफूल शेती केली. त्यामध्ये आंतरपीक म्हणून कांदा, भेंडी, काकडी ही नगदी पिकाची लागवड केली. कुठल्याही प्रकारचे रसायनिक खतांचा, औषधांचा वापर केला नाही. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड केली. यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च आला. लागवडीच्या एका महिन्यांपासून उत्पन्न सुरू झाले आहे.
सध्याच्या परिस्थितीत निसर्गात होणारे बदल, शेतमालास नसलेला हमीभाव, खत,औषधे यांच्या वाढलेल्या किंमती,ह्या विविध समस्याने शेती आणि शेतकरी दोन्ही अडचणीत सापडले. युवक वर्ग वडिलोपार्जित शेती व्यवसायापासून दूर जात असताना या शेतकऱ्याने संकटाशी सामना करत शेतीतून चांगले उत्पन्न घेतले.
कांदा, सूर्यफूल, काकडी, भेंडींची सेंद्रीय पद्धतीने लागवड केली. या उत्पादनाला बाजारात चांगली मागणी आहे. आतापर्यंत चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आणखी दोन ते तीन लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. युवा शेतकऱ्यांनी देखील आधुनिकीकरणाची कास धरून सेंद्रीय शेती करण्याचा आग्रह गजानन जमवणे धरत आहेत.