कळवा, मुंब्रा भागातील वाहतूक कोंडी निकाली निघणार, जितेंद्र आव्हाड आणि एमएमआरडीए आयुक्तांकडून सर्व प्रकल्पांची पाहणी

| Updated on: Nov 19, 2021 | 12:21 AM

कोर्टाद्वारे मफतलाल कंपनीची संपूर्ण जमिन विकत घेण्याची म्हाडाची तयारी आहे. आजच्या गणितानुसार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा निवासी संकुल प्रकल्प असेल. जर कोर्टाने हा प्रकल्प मान्य केला. तर, तिथे 29 हजार घरे बांधणे शक्य होणार आहे.

कळवा, मुंब्रा भागातील वाहतूक कोंडी निकाली निघणार, जितेंद्र आव्हाड आणि एमएमआरडीए आयुक्तांकडून सर्व प्रकल्पांची पाहणी
कळवा, मुंब्रा भागातील वाहतूक कोंडी निकाली निघणार
Follow us on

ठाणे : कळवा, मुंब्रा, विटावा भागाला भेडसावणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून कळवा खाडीवर उभारण्यात येत असलेला तिसरा पूल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे न उतरविता आता तो पटनी मैदानाजवळ उतरविण्यात येणार आहे. तर, कळव्यात प्रवेश करताना खाडीपुलाच्या डाव्या बाजूला नवीन रस्ता तयार करुन तो आत्माराम पाटील चौकापर्यंत नेण्यात येणार आहे. शिवाय, अनेक दिवसांपासून रखडलेल्या विटाव्याच्या पुलाचे कामही आगामी चार महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कळवा-मुंब्रा येथील वाहतूक कोंडीवर मात करणार्‍या काही प्रकल्पांची सूचना ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एमएमआरडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये केली होती. नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने या प्रकल्पांना अजेंड्यावर आणण्यात आलेले आहे. याच प्रस्तावित प्रकल्पांची पाहणी ना. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांनी आज केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ना. डॉ. आव्हाड यांनी ही माहिती दिली.

प्रकल्पांचा विकास आराखडाही तयार

कळवा- मुंब्रा भागातील वाहतूक कोंडीवर मात करणारे काही मोठे प्रकल्प राजीव हे एमएमआरडीचे आयुक्त असताना प्रस्तावित केले होते. त्याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये या प्रस्तावित प्रकल्पांना मूर्त स्वरुप देण्याबाबत चर्चा झाली. या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांच्यासह पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौर्‍यानंतर श्रीनिवासन यांनी या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पांचा विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे.

मुंब्रा बायपासवर टोल सुरु करावा

मुंब्रा बायपास हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. दोन मार्गावरील टोल वाचविण्यासाठी अनेक अवजड वाहनचालक मुंब्रा बायपास मार्गाचा वापर करीत आहेत. परिणामी, ह्या रस्त्याची दुरावस्था होत आहे. जर या ठिकाणी पथकर सुरु केला तर टोल वाचविण्यासाठी या मार्गाचा अवलंब करणारे या मार्गावर येण्याचे प्रमाण कमी होईल. आणि येथील रस्त्याची दुरवस्था होणार नाही. यासाठी आपण मागील सरकारकडेही मागणी केली होती. आता अशोक चव्हाण यांनी त्यास मान्यता दिली आहे. टोल बसविल्याने आता रस्त्यावरील भार कमी होऊन रस्ता सुस्थितीमध्ये राहिल, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

मफतलाल कंपनीची जमीन म्हाडाने विकत घ्यावी

कोर्टाद्वारे मफतलाल कंपनीची संपूर्ण जमिन विकत घेण्याची म्हाडाची तयारी आहे. आजच्या गणितानुसार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा निवासी संकुल प्रकल्प असेल. जर कोर्टाने हा प्रकल्प मान्य केला. तर, तिथे 29 हजार घरे बांधणे शक्य होणार आहे. शिवाय, शेजारची झोपडपट्टीही विकसित होईल. त्यामुळे कळव्याचा विकास होईल. कोर्टाने तीन हिस्से करावेत; कामगार, बँक आणि सरकार! सरकारला जे देणे लागत आहे. म्हाडा ही सरकारचीच संस्था असल्याने म्हाडा आणि सरकार ते निश्चित करेल. कामगारांची देणी म्हाडा तत्काळ देईल. राहिला बँकर्सचा प्रश्न तर डुबीत गेलेले हे पैसे एकाच वेळी समझोत्याने निकाली काढून या ठिकाणी राज्यातील सर्वात मोठा गृहप्रकल्प उभा राहिल. या संदर्भात अडॅव्होकेट जनरल कुंभकोणींशी चर्चा झाली असून तसा प्रस्ताव ते कोर्टात मांडणार आहेत. त्यातून कळव्याचा चेहरामोहराच बदलणार आहे. (Traffic congestion in Kalwa, Mumbra area will be resolved)

इतर बातम्या

अनधिकृत बांधकामे सोडून आमची मंदिरे तोडणार तर उद्रेक होणारच; राजू पाटील यांचा सज्जड इशारा

CCTV | नव्या-कोऱ्या मोबाईलला हातही लावला नाही, बदलापुरात दुरुस्तीसाठी आलेल्या फोनवर चोरट्यांचा डल्ला