
महाराष्ट्र : अहमदनगरला (Ahmadnagar) पारनेर बाजार समिती निवडणुकीत (Market committee elections) राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (nilesh lanke) आणि ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी यांच्या झालेल्या आघाडीवरून भाजप खासदार सुजय विखे यांनी सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात तालुक्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट होता. तसेच शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना धमकाविले जात होते. दडपशाही केली जात होती. हे सर्व विसरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली. बाजार समिती निवडणुकीत ताकदीने सामोरे जाणार असून स्वाभिमान गहाण ठेवुन औटींनी तडजोडी केल्याची टीका सुजय विखेनी केली आहे. तसेच सत्तेसाठी लाचारी कोणी पत्कारली हे सर्व जण पाहत आहेत.
मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ महाविकास आघाडीने आणि भाजप मित्रपक्षांकडून फोडला. वडगांव ग्रामदैवत पोटोबा महाराज यांच्या मंदिरात महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ केला.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल असा सर्वत्र प्रचार केला गेला. मात्र आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काढता पाय घेतला आहे. काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाने करत, महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलशी शिवसेनेचा काही संबंध नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे गटाने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे गंगाधर माळी मात्र महाविकास आघाडीच्या प्रचारात पूर्ण ताकद निषी आमदार कुणाल पाटील यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटांमध्येच दोन गट पडल्याचं बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून येत आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन माजी सभापतींच्या नेतृत्वात पॅनलची निर्मिती झाली आहे. माजी सभापती राष्ट्रवादीचे नेते देविदास पिंगळे यांच्या ‘आपलं पॅनल’ आणि माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या ‘शेतकरी विकास पॅनल’ मध्ये ही लढत होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप अशी ही लढत होणार असून, सत्ता बदलानंतर सहकार क्षेत्रात शिवसेना आणि भाजपची ही लिटमस टेस्ट असणार आहे. एकूण 18 पैकी तीन जागा या याअगोदर बिनविरोध झाल्या असून, 15 जागांसाठी एकूण 39 उमेदवार रिंगणात आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागतो, हे बघणं महत्त्वाचं आहे.