उद्धव ठाकरे यांचे पुन्हा भाजपाशी मनोमिलन?, पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट
उद्धव ठाकरेयांनी महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनदा भेट घेतली होती.आता उद्धव ठाकरे यांनी एका लग्न सोहळ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन गप्पा मारल्याने ठाकरे पुन्हा भाजपाशी हस्तांदोलन करतात की काय ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जातीने भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीकडे राजकीय निरीक्षकांनी पुढील राजकारणाचे संकेत मिळत असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते एकाच मंचावर आले आहेत. त्याचे झाले काय भाजपाचे नेते पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त उद्धव ठाकरे वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी पोहचले तेव्हा भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची गुफ्तगू झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो ही उक्ती नेहमीच खरी ठरत आली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची आज एका लग्न सोहळ्यामध्ये भेट झाली आहे. भाजपाचे विलेपार्ले येथील आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या लग्नसोहळ्यात उभयंतात भेट झाली आणि राजकारणावर चर्चा देखील झाल्याचे म्हटले जात आहे. चंद्रकांत पाटील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. शिवसेनेने देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर नेहमीच कठोर टीका केली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी भेटल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.
भेटींचा सिलसिला
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पराग अळवणी यांच्या कन्येचा विवाह सोहळा होता. त्यानिमित्ताने शिवसेना नेते उद्धव ठाकरे वधू-वरांना शुभार्शीवाद देण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत हे देखील होते. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना देखील चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट देखील चर्चेत आली होती. भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची विधानभवनातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. एकमेकांना कायम पाण्यात पाहाणारे दोन्ही नेते त्रयस्थ सोहळ्यात एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारु लागल्याने राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपाशी हस्तांदोलन करतात की काय ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/whatapp-news.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cyber-attack-on-amazon-prime-users.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/MD-DRUGS.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/ghee-1.jpg)
नेमके काय घडलं
या विवाह सोहळ्याला हजर राहून वधूवरांना आशीवार्द देऊन बाहेर पडत असताना उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकमेकांसमोर आले. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या पुढे चालले होते.त्यामुळे सहाजिकच मिलिंद नार्वेकर यांची आधी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे झाले. यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी मिश्किलपणे चंद्रकांत पाटील यांना विचारले की काय युती कधी होतेय ?
त्यावर दिलखुलास पणे चंद्रकांत पाटील यांनी देखील तो माझ्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असेल ! असे म्हटले. त्यानंतर हशा उसळून दोघांनी एकमेकांना टाळी दिली.
पाठून उद्धव ठाकरे देखील आले आणि त्यांनी दोघांना (चंद्रकांत पाटिल आणि मिलिंद नार्वेकर ) उद्देश्युन विचारले की अरे काय कुजबुजताय ? त्यावर चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहात म्हणाले की, मीच हेच म्हणत होतो, युती होईल तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल ! पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये जोरदार खसखस पिकली…. पुन्हा हशा….