Wardha Shivsena : वर्ध्यातील शिवसेनेत मोठी खांदेपालट, संपर्क प्रमुख बदलले, अंतर्गत धुसफूस थांबवण्याचे आव्हान
आज नवनियुक्त शिवसेनेच्या वर्धा जिल्हा संपर्कप्रमुखपदी बाळा राऊत (Bala Raut) यांनी वर्ध्यातील विश्रामगृहात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

वर्धा : राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार आहे. तर शिवसेना (Shivsena) ही मुख्यमंत्रीपदाच्या (Cm Uddhav Thackeray) खुर्चीवर विराजमान आहे. मात्र स्थानिक लेव्हलचा अंतर्गत संघर्ष अजूनही संपायचे नाव घेत नाही. मागील काळापासून शिवसेनेतील अंतर्गत कलह बरेचदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे एक मंत्री राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात शिवसेनेचे अनेक जुने पदाधिकारी शिवसेनेपासून दूर गेले असून काही नवीन चेहरे जोडले गेले आहेत. आता जिल्ह्यात संपर्कप्रमुख बदलण्यात आले आहेत. संपर्कप्रमुखांपुढे पक्षांतर्गत धुसफूस रोखण्याचे आव्हान असणार आहे. हे आव्हान संपर्कप्रमुख कसे पेलतात, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. आज नवनियुक्त शिवसेनेच्या वर्धा जिल्हा संपर्कप्रमुखपदी बाळा राऊत (Bala Raut) यांनी वर्ध्यातील विश्रामगृहात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी बाळा राऊत यांना
शिवसेनेच्या पदाधिकार्यांत अनेक बदल झालेत. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात शिवसेना अधिक प्रबळ होती. येथील अशोक शिंदे हे शिवसेनेचे आमदार राहिलेत. ते शिवसेनेचे सरकार असताना मंत्रीही राहिलेत. दरम्यानच्या काळात अनेक पक्षांतर्गत बदल झालेत. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना सोडून दुसर्या पक्षात गेले तर अनेक जण नव्याने शिवसेनेसोबत जुळलेत. मागील काही दिवसांत तर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. मध्यंतरी संपर्क प्रमुख म्हणून असलेले माजी खासदार अनंत गुढे यांच्याकडून पदभार काढण्यात आला. अनंत गुढे यांच्याऐवजी संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी ठाणे येथील माजी नगरसेवक बाळा राऊत यांना देण्यात आली. बाळा राऊत यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा केली.दरम्यान, पक्षांतर्गत कोणतीही धुसफूस नसून सगळे एकत्रच असल्याचे नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख बाळा राऊत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
स्थानिक लेव्हलचा संघर्ष आता तरी संपणार?
विश्रागृहात मंगळवारी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी होते. जवळपास 200 ते 300 कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मते जाणून घेण्यात आली. पुढे जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आता धुसफूस दूर सारत जुने दुरावलेले पदाधिकारी, कार्यकर्ते जोडणार काय, हेही बघणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यतलं चित्र जरी वेगळं असले तरी स्थानिक लेव्हलचा संघर्ष हा वेगळ्या स्वरुपाचा असतो. स्थानिक लेव्हलला मानापानाचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे याचा फटका अनेकदा पक्षाला बसतो. शिवसेनेच्या बाबतीतही काहीसं असेच चित्र गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे.



