दुर्घटनेमुळे व्यथित, दोषींना सोडणार नाही – हातरस दुर्घटनेनंतर भोले बाबा पहिल्यांदा समोर
हातरस दुर्घटनेनंतर भोले बाबा पहिल्यांदाच समोर आले आहेत. बाबा सूरजपाल यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त करत या दुर्घटेनासाठी दोषी असलेल्यांना सोडणार नाही, असे ठणकावू सांगितलं. हातरस येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी होऊन 121 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
हातरस दुर्घटनेमध्ये 121 जणांच्या मृत्यूनंतर फरार असलेले सूरज पाल ऊर्फ भोले बाबा ऊर्फ नारायण साकार विश्व हरी यांनी पहिल्यांदाच मीडियासमोर येऊन वक्तव्य केले आहे. 2 जुलैच्या घटनेनंतर आपण खूप व्यथित झालो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. ‘या दु:खाच्या प्रसंगातून सावरण्याचे बळ ईश्वर आपल्याला देवो. सर्व सरकारी प्रशासनावर विश्वास ठेवा ‘ असे आवाहन त्यांनी केले. अराजकता पसरवणाऱ्यांना सोडणार नाही. मी माझे वकील एपी सिंग यांच्यामार्फत समितीच्या सदस्यांना विनंती केली आहे की त्यांनी शोकग्रस्त कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी उभे राहून त्यांना आयुष्यभर मदत करावी, त्यांनी नमूद केले. मंगळवारी भोले बाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला होता.
दुर्घटनेच्या 4 दिवसांनंतर समोर आले भोले बाबा
हातरस दुर्घटना ज्या दिवशी झाली, तेव्हापासूनच बाबा सूरजपाल बेपत्ता होते. या दुर्दैवी घटनेच्या चार दिवसांनंतर प्रथमच ते समोर आले आहेहत. मात्र त्यापूर्वी, दुर्दैवी घटनेनंतर सुमारे 30 तासांनंतर, बाबांचे एक लेखी निवेदन समोर आले होते. त्यामध्ये त्यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. गुरुवारी त्यांनी जाहीर केलेल्या लेखी संदेशात बाबा सूरजपाल यांनी असा दावा केला की , काही अनियंत्रित घटकांनी ही चेंगराचेंगरी घडवली, त्यामुळेच एवढी मोठी दुर्घटना घडली.
हातरसमधील या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. बाबा सूरजपाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एपी सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. हे तेच एपी सिंह आहेत, ज्यांनी निर्भया प्रकरणातील आरोपी, सीमा हैदर आणि 2020 हातरस प्रकरणातील आरोपींचा खटला लढवला होता. दुसरीकडे, या दुर्दैवी घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला अटक करण्यात आली आहे.
#WATCH | Hathras Stampede Accident | Mainpuri, UP: In a video statement, Surajpal also known as ‘Bhole Baba’ says, “… I am deeply saddened after the incident of July 2. May God give us the strength to bear this pain. Please keep faith in the government and the administration. I… pic.twitter.com/7HSrK2WNEM
— ANI (@ANI) July 6, 2024
कोट्यवधींचे साम्राज्य, अनेक राज्यात आहेत बाबांचे अनुयायी
नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांचे कोट्यवधींचे साम्राज्य आहे. बाबा सूरजपाल यांचे अनेक राज्यांत आश्रम आहेत. सूरज पाल हे स्वतःला देवाचा सेवक म्हणवतात. तर त्यांचे भक्त त्यांना देवाचा अवतार मानतात. भोले बाबा हे जाटव समाजाचे आहेत. गरीब वर्गात त्यांचे भक्त जास्त आहेत. हातरस, एटा, आग्रा, मैनपुरी आणि शाहजहांपूर येथे त्यांचा बराच प्रभाव आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये त्यांचे अनेक अनुयायी आहेत. तसेच दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडमध्येही त्यांचा प्रभाव आहे. प्रत्येक सत्संगात लाखोंची गर्दी असते. बाबांचे उत्तर प्रदेशात जवळपास 25 आश्रम आहेत.