विमानाने उड्डाण घेतले आणि 2 तास आकाशात घिरट्या घातल्या, पुन्हा त्याच विमानतळावर उतरले !
विमानाने सुखरुपपणे उड्डाण घेतले आणि प्रवासी निश्चित झाले परंतू कॉकपिटमध्ये सायरन वाजू लागल्याने वैमानिकांनी तपास केला तर मोठा बिघाड नजरेस आला. त्यामुळे विमानाला पुन्हा माघारी नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
विमान प्रवासात कधी काय होऊ शकते याचा काही नेम नाही. एका विमानाला उड्डाण घेतल्यानंतर आकाशात दोन तास घिरट्या मारत राहावे लागले. त्यानंतर त्याच विमानतळावर जेथून त्याने उड्डाण घेतले होते तेथेच दोन तासांनी उतरावे लागले. तामिळनाडू येथे तिरुचिरापल्ली येथे ही विचित्र घटना घडली आहे. या बिघाडास नेमके कोणते तांत्रिक घटक जबाबदार आहेत याची चौकशी करण्यात येणार आहे. आमचे प्राधान्य प्रवाशांचे प्राण वाचविण्यात होते, त्यात आम्हाला यश आल्याचे एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
एअर इंडीया एक्सप्रेसचे विमान Flight AXB 613 तिरुचिरापल्ली ते शारजाह अशा प्रवासासाठी शुक्रवारी सायंकाळी 5.40 वाजता निघाले. बोईंग 737-800 या कंपनीच्या या विमानाने सुरळीतपणे आकाशात टेक ऑफ केल्यानंतर लँडिंग गियर नेहमीप्रमाणे मागे घेण्यात आले. परंतू जेव्हा जेव्हा लँडिंग गियर वा अंडरकेरेज यशस्वीरित्या स्टोव्ह केले गेले. तेव्हा कॉकपिटमध्ये सेंसर वाजू लागले.तेव्हा तपास केला असता विमानाची चाके बाहेर काढणाऱ्या हायड्रॉलिक सिस्टीममधून सर्व ऑईल वाहून गेल्याचे निदर्शनास आले.जे अंडर कॅरेज नियंत्रित करीत असते.
अन् प्रवाशांचा जीव भांड्यात पडला
त्यामुळे पायलटने पुन्हा तिरुचिरापल्ली विमानतळावर माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. परंतू विमानातील इंधनाच्या टाक्या संपूर्णपण भरलेल्या असल्याने विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करणे धोकादायक होते. त्यामुळे विमानाचे इंधन संपेपर्यंत ते आकाशातच घिरट्या मारत राहीले.तिरुचिरापल्ली विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींगसाठी सज्जता ठेवण्यात आली. तिरुचिरापल्ली विमानतळाचे डायरेक्टर गोपालकृष्णन यांनी सांगितले की 20 एम्ब्युलन्स आणि 18 फायर इंजिन विमानतळावर कोणतीही अपघाताची घटना हाताळण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली होती. त्यानंतर अखेर इंधन संपत आल्यावर सायंकाळी 5.40 वाजता निघालेले हे विमान रात्री 8.15 वाजता पुन्हा त्याच विमानतळावर सुखरुपणे उतरले तेव्हा प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.